मुंबईतील विद्याविहार पश्चिम परिसरात मंगळवारी (दि.१०) सकाळी घडलेल्या एका घटनेने तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. शंकरनगर, खालई गाव भागात एका महिलेने तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलाला उचलून नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला असून, सतर्क नागरिकांनी तिला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
परिसरात भीतीचं वातावरण
प्रत्यक्षदर्शींनुसार, मुलाला उचलून नेण्याचा संशय येताच पालक आणि स्थानिक रहिवाशांनी तात्काळ हस्तक्षेप केला. संतप्त नागरिकांनी संबंधित महिलेला थांबवत तिला मारहाण केली आणि नंतर विद्याविहार पोलिसांच्या ताब्यात दिलं. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, अनेक पालकांनी मुलांना घराबाहेर खेळायला पाठवताना अधिक सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे.
रॅकेटचा संशय; तपासाची मागणी
काही रहिवाशांनी ही घटना मुलं पळवणाऱ्या टोळीशी संबंधित असू शकते, अशी शंका व्यक्त करत सखोल तपासाची मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
मुंबईत बेपत्ता मुलांच्या घटनांमुळे चिंता वाढली
मुंबईत अल्पवयीन मुलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली असतानाच ही घटना समोर आल्यामुळे पालकांमध्ये भीती आहे. काही दिवसांपूर्वीच (१ फेब्रुवारी) 'फ्री प्रेस जर्नल'ने, केवळ ३६ तासांत मुंबईतून १२ मुले बेपत्ता (८ मुली) झाल्याचे वृत्त दिले होते.