मुंबई : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा पावसाने जोर पकडला आहे. रविवारी (दि. ) सकाळपासून मुंबईसह वसई-विरार, नालासोपारा आणि आसपासच्या भागांत जोरदार पाऊस झाला. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते जलमय झाले असून, वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. काही ठिकाणी नागरिकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागली.
वसई-विरारमध्ये रस्ते पाण्याखाली
वसई आणि विरार परिसरात सकाळपासून झालेल्या पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचलं. काही सखल भागात गुडघाभर पाणी साचल्याचं दिसून आलं. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांमध्येही पाणी साचलं असून, वाहतुकीचा वेग मंदावला आहे. पाणी साचल्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन कामांवरही परिणाम झाला.
नालासोपाऱ्यात गणपतीची तयारी रखडली
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर नालासोपाऱ्यात बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे नालासोपारा पूर्वेकडील रेल्वे स्थानकाजवळील फुलांचा बाजार आणि मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं. त्यामुळे फुलं आणि फळ विक्रेत्यांचं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे.
सेंटर पार्क आणि तुलिंज पुलाजवळही पाणी साचल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. दुकानं, रस्ते आणि काही सोसायट्यांच्या परिसरात पाणी शिरल्याने नागरिकांची गैरसोय झाली.
मुंबईसह ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट
भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि महानगर परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईसोबतच पालघर, धुळे आणि नंदुरबारलाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, रायगडसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने काही ठिकाणी वादळी पावसासह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. काही भागात वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे नागरिकांनी पावसासोबतच विजांच्या कडकडाटाच्या वेळीही काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.