मुंबई : मेट्रो ३ रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली असून वरळी येथील मेट्रो रेल्वे स्टेशनच्या नावातून नेहरू नाव वगळण्यात आले आहे. पंडित जवाहरलाल नेहरू या नावाची भाजपला अॅलर्जी असल्याने नेहरू नाव वगळून फक्त सायन्स सेंटर ठेवण्यात आले आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपवर केला आहे.
मुंबईतील भुयारी मेट्रो रेल्वेचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच झाले. भुयारी मेट्रो रेल्वे स्टेशनच्या नेहरू तारांगण येथील स्टेशनचे नाव फक्त सायन्स सेंटर इतकेच ठेवण्यात आले आहे. “पंडित जवाहरलाल नेहरू यांचे कर्तृत्व एवढे महान आणि अढळ आहे की, भाजपने त्यांच्याविषयी कितीही दुस्वास दाखवला किंवा चारित्र्यहननाचा प्रयत्न केला, तरी ते प्रयत्न आभाळावर थुंकण्यासारखेच ठरतील,” अशी टीका काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केली आहे.
“संपूर्ण देशाला माहीत आहे की, वरळी येथील हे स्थान नेहरू सायन्स सेंटर म्हणूनच ओळखले जाते. मुंबई मेट्रो-३ च्या ट्विटमध्येही ‘डिस्कव्हरी हब्स’ यादीत या ठिकाणाचे नाव नेहरू सायन्स सेंटर असेच दाखवले आहे. पण नेहरू या नावाची ॲलर्जी असल्यामुळे भाजपने मुद्दामहून ते नाव वगळून या मेट्रो स्थानकाचे नाव केवळ सायन्स सेंटर असे ठेवले आहे. ही बाब अत्यंत आक्षेपार्ह असून भारताचे पहिले पंतप्रधान आणि जागतिक किर्तीचे नेते भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरूजी यांच्या स्मृतीचा मोठा अवमान आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे कर्तृत्व एवढे महान आणि अढळ आहे की, भाजपने त्यांच्याविषयी कितीही दुस्वास दाखवला किंवा चारित्र्यहननाचा प्रयत्न केला, तरी ते प्रयत्न आभाळावर थुंकण्यासारखेच ठरतील,” अशी टीकाही सचिन सावंत यांनी केली.