मुंबई

मी निर्दोषच - नारायण राणे; संजय राऊत मानहानी प्रकरणात न्यायालयात दावा

राणे यांनी निर्दोष असल्याचे कबूल केल्यानंतर, येत्या ११ नोव्हेंबरपासून साक्षीदारांच्या जबाबांची नोंद घेऊन या प्रकरणातील खटला दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात सुरू होणार आहे.

Swapnil S

मुंबई : भाजपचे खासदार नारायण राणे यांनी शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात सोमवारी मुंबईतील न्यायालयात स्वत:ला निर्दोष असल्याचे सांगितले.

राणे यांनी निर्दोष असल्याचे कबूल केल्यानंतर, येत्या ११ नोव्हेंबरपासून साक्षीदारांच्या जबाबांची नोंद घेऊन या प्रकरणातील खटला दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात सुरू होणार आहे.

राऊत यांनी माजी केंद्रीय मंत्री राणे यांनी १५ जानेवारी २०२३ रोजी भांडुप येथे आयोजित कोकण महोत्सवात केलेल्या वक्तव्यांबद्दल मानहानीकारक, द्वेषपूर्ण व खोटे असल्याचा आरोप करत फौजदारी तक्रार दाखल केली होती.

भाजप नेते राणे यांनी राऊत यांचे नाव मतदार याद्यांमध्येच नाही असे म्हटले होते तसेच ते (राणे) शिवसेनेत असताना राऊत यांना राज्यसभेत पाठवण्यास मदत केली होती, असा दावा केला होता.

या आरोपांवर राऊत यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४९९ आणि ५०० (मानहानी) अंतर्गत कारवाईची मागणी केली होती. सोमवारी वरिष्ठ भाजप खासदार राणे आपल्या वकिलासह मजगाव न्यायालयातील न्यायिक दंडाधिकारी ए. ए. कुलकर्णी यांच्यासमोर हजर झाले आणि आरोप नाकारले.

यापूर्वी एप्रिल महिन्यात दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने तक्रारीची दखल घेत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार राणे यांना समन्स बजावले होते. राणे यांनी या समन्सविरोधात विशेष खासदार/आमदार न्यायालयात याचिका दाखल करून, माझ्याविरोधात मानहानीचा गुन्हाच होत नाही, असे सांगितले होते. त्यात दंडाधिकाऱ्यांनी “न्यायिक मनोभूमिका न लावता किंवा कारण न देता समन्स बजावले” असा दावा केला होता.

विशेष न्यायालयाने म्हटले की राणे यांनी शिवसेना (यूबीटी) चे राज्यसभा खासदारांविरुद्ध अस्पष्ट व अप्रमाणित विधाने केली, जी द्वेषभावना दर्शवतात.

न्यायालयाने असेही नमूद केले की प्राथमिकदृष्ट्या राणे यांची विधाने खोटी आणि सार्वजनिकरीत्या केलेली असल्याने मानहानीच्या कायद्यानुसार आरोप आणि प्रकाशनाचे सर्व घटक पूर्ण होतात.

"व्हिडीओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही"; CJP आंदोलकांच्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे भाष्य, तातडीच्या सुनावणीस नकार

आता AI ठेवणार पक्ष्यांवर नजर! महाराष्ट्रात उभारलं जाणार देशातील पहिलं AI-आधारित पक्षी अभयारण्य

Mumbai Rains : पावसात अडकलेल्या मुंबईकरांना 'Vi'चा दिलासा! स्टोअरमध्ये घेता येणार आश्रय, मोबाईल चार्जिंगचीही सोय

१८ वर्षीय तरुणाने घातला ६५ कोटींचा गंडा! AI च्या मदतीने बनवले १२१ बनावट अ‍ॅप्स

Mumbai Rain Alert : मुंबईत मुसळधार पावसासह भरतीचाही धोका; वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन