मुंबई

आता उद्धव ठाकरेंची ‘महाप्रबोधन यात्रा’; टेंभीनाक्यावर पहिली सभा होणार

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले

प्रतिनिधी

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ४०पेक्षा जास्त आमदार निघून गेल्याने शिवसेनेत मोठी पडझड झाली आहे. ही गळती रोखण्यासाठी युवानेते आदित्य ठाकरे मैदानात उतरले होते. आदित्य यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत असताना आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मैदानात उतरत गणेशोत्सवानंतर महाराष्ट्र दौरा सुरू करणार असल्याची घोषणा केली. आदित्यच्या ‘निष्ठा यात्रे’नंतर आता उद्धव ठाकरे ‘महाप्रबोधन यात्रे’च्या निमित्ताने महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात टेंभीनाक्यावर उद्धव ठाकरे यांची पहिली सभा होणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले. जवळपास ४० आमदारांनी आणि राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर १२ खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर शिवसेनेला सावरण्यासाठी आदित्य ठाकरे ताकदीने मैदानात उतरले. आता ऑगस्ट महिन्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली असून गणेशोत्सव संपल्यावर उद्धव यांच्या ‘महाप्रबोधन यात्रे’चा श्रीगणेशा होणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले असतानाच त्यांच्याच बालेकिल्ल्यात म्हणजे ठाण्याच्या टेंभीनाक्याच्या मैदानात उद्धव ठाकरे पहिली सभा घेणार आहेत. या सभेत पक्षात नव्याने दाखल झालेले नेतेदेखील सामील होतील. आतापर्यंत पत्रकार परिषदा, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार-खासदारांवर तोफ डागली. आता थेट मैदानी सभांच्या माध्यमातून आणि विशेष म्हणजे शिंदे यांच्या होमग्राउंडवरून उद्धव ठाकरे शिंदेंना ललकारणार आहेत.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत