Palghar : भरधाव ट्रक थेट घुसला घरात 
मुंबई

Palghar : भरधाव ट्रक थेट घुसला घरात

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानिवरी येथे गुरुवारी सकाळी भरधाव ट्रकने नियंत्रण गमावत थेट एका घरात घुसल्याची घटना घडली.

Swapnil S

पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानिवरी येथे गुरुवारी सकाळी भरधाव ट्रकने नियंत्रण गमावत थेट एका घरात घुसल्याची घटना घडली. या अपघातात घराच्या भिंतींचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही दिवसांपूर्वी याच परिसरात झालेल्या भीषण अपघातात १४ निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा घडलेल्या या अपघातामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

धानिवरी परिसरातील मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा विकासाचा मार्ग न राहता आता मृत्यूचा सापळा बनला आहे. १४ जणांचा बळी गेल्यानंतरही अपघातप्रवण ठिकाणी मजबूत संरक्षक भिंती उभारण्यात आलेल्या नाहीत. तसेच वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस यंत्रणा उभी करण्यात आलेली नाही. परिणामी भरधाव ट्रक थेट घरात घुसल्याच्या या घटनेमुळे प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या परिसरालगतचा सर्व्हिस रोड शेकडो ग्रामस्थ, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वापरात आहे. त्यामुळे प्रत्येक दिवस हा त्यांच्यासाठी धोकादायक ठरत असून, कोणत्याही क्षणी आणखी एखादी मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. धानिवरी परिसरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर तातडीने संरक्षक भिंती, वेगमर्यादा नियंत्रण व्यवस्था, चेतावणी फलक आणि अन्य सुरक्षा उपाययोजना राबविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा भविष्यात आणखी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

हा 'भाजप विरुद्ध भारत' असा संघर्ष; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, मुंबईत तरुणाईचा विजयी जल्लोष

परीक्षा सुधारणांसाठी टास्क फोर्सची स्थापना; नंदन निलेकणी यांच्याकडे नेतृत्व; पंतप्रधानांची घोषणा

मार्ग निघतो संवादामधूनच!

आजचे राशिभविष्य, २७ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

रोज चालूनही पोट कमी होत नाही? ट्राय करा ३-३-३ वॉकिंग फॉर्म्युला; कॅलरी बर्न होऊन वजन घटण्यास होईल मदत