मुंबई : भारत लवकरच विविध देशांच्या संसदेबरोबर संसदीय मैत्री संघ स्थापन करणार असून संसदीय राजनैतिक संबंध बळकट करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले जात आहे, अशी माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारी दिली.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर दहशतवादाच्या विरोधातील भारताची भूमिका जागतिक स्तरावर मांडण्यासाठी विविध पक्षांचे प्रतिनिधीमंडळ जगातील अनेक राजधानी शहरांना भेट देऊन आले. त्या दौऱ्यांदरम्यानच आंतरसंसदीय मैत्री संघ स्थापनेचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
विविध देशांकडून अशा संघ स्थापनेबाबत प्रस्ताव आले आहेत, आणि त्यावर आम्ही काम करत आहोत, असे बिर्ला यांनी संसद आणि राज्य/केंद्रशासित प्रदेश विधिमंडळांच्या अर्थसंकल्प समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना सांगितले.
लोकसभा सचिवालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या मैत्री संघांचा कार्यकाळ संसदेमुळे मर्यादित असतो आणि १७व्या लोकसभेत एकही असा मैत्री संघ स्थापन झालेला नाही.
प्रस्तावाच्या अनुषंगाने, काँग्रेस नेते शशी थरूर, द्रमुक नेत्या कनीमोळी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे आदींच्या नेतृत्वाखाली ७ पक्षांचे बहुपक्षीय प्रतिनिधीमंडळे ३३ जागतिक राजधानींना भेट देऊन परतली.
या प्रतिनिधींच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींशी झालेल्या भेटीत अनेक देशांनी संसदीय मैत्री संघांच्या स्थापनेची इच्छा व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनीही संसदीय राजनैतिक धोरणाचा भाग म्हणून हा प्रस्ताव सकारात्मकपणे घेतला असल्याचे समजते.
बिर्ला यांनी सांगितले की, ते लवकरच सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून या संकल्पनेला पुढे नेण्यासाठी उपाययोजना करतील.