मुंबई : २२ सप्टेंबरपासून जीएसटी कपात लागू होणार असून बहुतांश कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किमती कमी केल्या आहेत. त्यातच रेल्वे प्लॅटफॉर्मवर मिळणारे 'रेलनीर' म्हणजेच १ लिटर पाण्याची बाटली आता १५ ऐवजी १४ रुपयांना मिळणार आहे. तसेच अमूल कंपनीनेही आपल्या ७०० उत्पादनांच्या किंमती कमी केल्या असून तूप लिटरमागे ४० रुपयांनी कमी झाले आहे.
अमूलचे तूप, बटर, आईस्क्रिम, बेकरी आणि फ्रोझन स्नॅक्सच्या किंमती जीएसटीच्या कपातीमुळे कमी करण्यात आल्या आहेत. नव्या किंमती २२ सप्टेंबरपासून लागू होतील. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनच्या पत्रकानुसार, देशभरातील ग्राहकांना फायदा व्हावा, यासाठी ७०० उत्पादनांच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दूध, तूप, बटर, आईस्क्रिम, चीज, पनीर, चॉकलेट्स, बेकरी उत्पादने कमी किंमतीत उपलब्ध होतील.
रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत निवेदनानुसार, रेलनीर या पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची कमाल किंमत प्रति १ लिटर १५ रुपयांवरून १४ रुपयांपर्यंत आणि प्रति ५०० मिली १० रुपयांवरून ९ रुपयांपर्यंत कमी केली जाईल.
रेल्वे परिसरात आणि गाड्यांमध्ये विकल्या जाणाऱ्या इतर बँडच्या पॅकेज्ड पाण्याच्या बाटल्यांनाही हे नवीन -दर लागू होतील. २२ सप्टेंबरपासून देशात नवीन जीएसटी दर लागू होणार आहेत. आतापर्यंत सध्याच्या जीएसटी प्रणालीमध्ये चार स्लॅब होते, त्यापैकी १२ आणि २८ टक्के स्लॅब रद्द करण्यात आले आहेत. आता फक्त ५ आणि १८ टक्के असे दोन स्लॅब -ठेवण्यात आले आहेत.