मुंबई : अभिनेता, दिग्दर्शक रितेश देशमुख याला मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी मोठा दिलासा दिला. चित्रपटाच्या नावातून 'छत्रपती' हा शब्द वगळल्यामुळे महाराजांचा अवमान होत असल्याचा दावा करत 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली. त्यामुळे शुक्रवारी १ मे रोजी चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख दिग्दर्शित व ज्योती देशपांडे यांची निर्मिती असलेला 'राजा शिवाजी' या चित्रपटाची घोषणा २०२४ मध्ये करण्यात आली होती व प्रदर्शनाची तारीख गेल्या वर्षीच जाहीर करण्यात आली होती. असे असताना चित्रपटाच्या नावातून 'छत्रपती' हा शब्द वगळल्यामुळे महाराजांचा अवमान होत असल्याचा दावा करत 'श्री छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशन' या संस्थेने हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती.
गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोरील सुनावणीवेळी निर्मात्यांच्या वतीने चित्रपट शिवाजी महाराजांच्या (१६७४ राज्याभिषेकापूर्वीच्या पूर्वीच्या) कालखंडावर आधारित आहे, तेव्हा त्यांना 'राजा शिवाजी' म्हणूनच संबोधले जाई. फिल्मच्या सुरुवातीला तसा 'डिस्क्लेमर' देण्यात आला असून सेन्सॉर बोर्डान त्यास मान्यता दिली आहे.
याचिकाकर्त्यांवर ताशेरे
हायकोर्टाने हा युक्तिवाद ऐकून घेत याचिकाकर्त्यांवर ताशेरे ओढले. चित्रपटाचे शीर्षक कोणत्याही प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्जाचा अवमान करणारे नाही. केवळ विकीपीडियावरील माहितीच्या आधारे अशाप्रकारची याचिका करणे चुकीचे आहे, असे कोर्टाने सुनावले.