मुंबई

मुंबईत उद्या सकाळपर्यंत 'रेड अलर्ट', तर ठाण्यात आज आणि उद्या 'ऑरेंज अलर्ट'

नवशक्ती Web Desk

मुंबई : आठवडाभरापासून बरसणाऱ्या पावसाने बुधवारी रात्री काहीशी उसंती घेतली. परंतु गुरुवार सकाळपासून पुन्हा एकदा मुंबई व परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. जोरदार पावसाचा तडाख्याने चर्चगेट, अंधेरी सब वे, सायन आदी सखल भाग जलमय झाल्याने रस्ते वाहतूक कोलमडली. तर मध्य व हार्बर मार्गावरील रेल्वे लोकल सेवा धीम्या गतीने सुरु असून चर्चगेट मरीन लाइन्स स्थानकातील रुळांवर पाणी जमा झाले. पश्चिम रेल्वे प्रशासनाने पंपाच्या साहाय्याने उपसा केला.

दरम्यान, मुंबईत शुक्रवार सकाळपर्यंत रेड अलर्ट तर ठाण्यात उद्या शुक्रवार व शनिवारी ऑरेंज अलर्ट' जारी केल्याचे कुलाबा हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले. दरम्यान , बुधवारी रात्री ८.३० ते गुरुवार सकाळी ८.३० पर्यंत कुलाब्यात रेकॉर्ड ब्रेक २२३.२ मिमी, सांताक्रुझ येथे १४५.१, भायखळा येथे ११९.० ही सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.


मुंबईत आठवड्याभरापासून पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी रात्री काहीशी उसंती घेतलेल्या पावसाचा जोर गुरुवारी वाढला. सतत बरसणाऱ्या पावसामुळे २६ जुलै २००५ ची आठवण ताजी झाली. गुरुवार सकाळपासून मुंबई शहर पूर्व व पश्चिम उपनगराला पावसाने झोडपले. पावसाच्या तडाख्याने मुंबईतील अनेक सखल भाग जलमय झाले. चेंबूर शेल कॉलनी, दादर टीटी, परळ, मंत्रालय परिसर, गोवंडी, मानखुर्द, धारावी, माहिम, भांडुप, मालाड, गोरेगाव, कांदिवली, वांद्रे कुर्ला हे भाग जलमय झाले.

सखल भाग जलमय त्यात रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य यामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहन चालकांना त्रासाला सामोरे जावे लागले. दरम्यान, मुंबई रेड अलर्ट जारी केले असून पावसाचीही दमदार इनिंग सुरु आहे.

गेल्या २४ तासांतील पावसाची नोंद
कुलाबा - २२३
सीएसएमटी - १५३.५
सांताक्रुझ - १४५.१
राम मंदिर - १६१.०
भायखळा - ११९.०
सायन - ११२.०
वांद्रे - १०६.०
चेंबूर - ८६.५
माटुंगा - ७८.५
दहिसर - ७०.५

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस