पालघर : पालघर लोकसभेचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, वेलंकणी यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने वलसाड-वेलंकणी-डहाणू रोड विशेष रेल्वे (क्र. ०९०३०/०९०२९) चालवण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे पालघर, ठाणे, मुंबई आणि मुंबई उपनगरातील हजारो ख्रिश्चन कोळी बांधवांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि परवडणारा होणार आहे.
दरवर्षी १ जून ते ३१ जुलै या मासेमारी बंदीच्या कालावधीत पालघर, ठाणे, मुंबई आणि मुंबई उपनगरातील ख्रिश्चन कोळी समाजातील भाविक मोठ्या संख्येने तमिळनाडूतील वेलंकणी येथे यात्रेसाठी जातात. यंदा ६ ते १६ जुलैदरम्यान सुमारे २० हजार यात्रेकरू वेलंकणीला जाणार असल्याने त्यांच्यासाठी विशेष रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी केली होती.
यासाठी जी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष तसेच दक्षिण रेल्वेचे महाव्यवस्थापक यांना पत्र पाठवून विशेष रेल्वे चालविण्याची विनंती केली होती. त्यांच्या या पाठपुराव्याची दखल घेत पश्चिम रेल्वेने 'ट्रेन ऑन डिमांड' (TOD) योजनेअंतर्गत विशेष भाडेतत्त्वावर ही रेल्वे चालवण्यास मंजुरी दिली आहे. या विशेष रेल्वेला डहाणू रोड, पालघर, वसई रोड, पनवेल, लोणावळा, पुणे, दौंड, सोलापूर, कलबुर्गी, वाडी, रेणिगुंटा, काटपाडी, विल्लुपुरम आणि मयिलादुथुराई या प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
वेलंकणीपर्यंतचा प्रवास लांबचा आणि खर्चिक असल्याने विशेषतः वृद्ध, महिला आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.