अवधूत खराडे/मुंबई
मुंबईत २०२६ च्या पहिल्या तिमाहीत रस्ते गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून चोरी, लुटमार आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. मुंबई पोलीस दलाने जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीतील गुन्ह्यांची आकडेवारी जाहीर केली आहे. यानुसार मालमत्तेशी संबंधित गुन्हे वाढत आहे. मात्र, असे असूनही पोलिसांकडूनही गुन्ह्यांचा वेगवान तपास होत आहे.
आकडेवारीनुसार, चोरीच्या घटना १,३९७ वरून १,६२१ वर पोहोचल्या आहेत. पोलिसांनी यातील ५२२ गुन्ह्यांची उकल केली आहे. वाहन चोरीच्या ५८० घटनांची नोंद झाली असून २८७ गुन्हे उघड झाले आहेत. लुटमारीच्या घटनांमध्येही वाढ झाली असून ९० पैकी ८८ गुन्हे पोलिसांनी उकलले आहेत. गेल्या वर्षी याच काळात ७४ लुटमारीच्या घटना घडल्या होत्या. दरोड्याच्या ६ घटनांची नोंद झाली असून सर्व ६ गुन्हे पोलिसांनी उघड केले आहेत.
मालमत्तेशी संबंधित गुन्हे
घरफोडीच्या घटना २३४ झाल्या असून गेल्या वर्षी हा आकडा २५७ होता. मालमत्तेशी संबंधित गुन्हे शहरात वाढत असले तरी सक्रिय पोलीस यंत्रणा आणि जलद तपासामुळे गुन्हेगारांना पकडण्यात यश आले आहे.
सोनसाखळी, लुटमारीच्या घटना
सोनसाखळी चोरीच्या घटना २१ वरून २५ वर गेल्या असून २३ गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला आहे. हिसकावून चोरी करण्याच्या घटनांमध्ये मात्र घट झाली असून त्या ५२ वरून ३८ वर आल्या आहेत. यातील ३४ गुन्हे उघड झाले आहेत.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी लुटमारीच्या गुन्ह्यांमध्ये ९८ टक्के आणि सोनसाखळी चोरीमध्ये ९२ टक्के तपासाचे प्रमाण राखले असून आपली कार्यक्षमता दाखवून दिली आहे. वेगवान तपास केला आहे.