मुंबई : विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या बीएलओ शिक्षकांवर अन्याय होत असून त्यांना देण्यात येणारे केवळ ६ हजार रुपये मानधन अत्यंत अपुरे आहे. या शिक्षकांना किमान २५ हजार रुपये मानधन देण्यात यावे, अशी जोरदार मागणी शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभागाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
एसआयआर मोहिमेअंतर्गत शिक्षकांनी ऊन, पाऊस, वारा यांची पर्वा न करता गावागावात, वाड्या-वस्त्यांमध्ये तसेच शहरांतील गल्लीबोळांत फिरून घराघरात जाऊन मतदार पडताळणी व नोंदणीचे काम केले आहे. अनेक अडचणी, तांत्रिक अडथळे आणि वेळेच्या मर्यादा असूनही शिक्षकांनी राष्ट्रीय कर्तव्य समजून ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे.
या कामासाठी शिक्षकांना स्वतःच्या खिशातून प्रवास खर्च, दूरध्वनी व इतर खर्च करावे लागले आहेत. अनेक शिक्षकांनी शालेय कामकाज सांभाळत अतिरिक्त वेळ देऊन एसआयआरचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. मात्र एवढ्या परिश्रमांनंतर त्यांना केवळ ६ हजार रुपये मानधन देणे हे अन्यायकारक असून त्यांच्या योगदानाचा अवमान करणारे आहे, असे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी म्हटले आहे.
बीएलओ शिक्षकांनी निवडणूक प्रक्रियेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या श्रमांचा योग्य सन्मान व्हावा यासाठी मानधनात तातडीने वाढ करून ते किमान २५ हजार रुपये करण्यात यावे, अशी मागणीही शिक्षक महासंघाने केली आहे.