भाईंदर : मिरा-भाईंदरमध्ये डायमंड बनविणाऱ्या टोरेस या खासगी कंपनीने गुंतवणूकदारांना जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रामदेव पार्क परिसरात टोरस नावाची आर्टिफिशल डायमंड विक्री करणाऱ्या कंपनीने नागरिकांना जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची लाखो रुपयांची फसवणूक करून पसार झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे.
मुंबईसह भाईंदर पूर्वेच्या रामदेव पार्क येथे टोरेस नावाच्या कंपनीने काही महिन्यापूर्वी ऑफिस सुरू केले होते. या कंपनीने गुंतवणूकदारांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवले, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांची ऑफर दिली होती. त्यांच्या गुंतवणुकीवर आठवड्याला ठराविक टक्केवारीने रक्कम दिली जाईल असे सांगण्यात आले होते. या झटपट पैसा मिळण्याच्या या अमिषाला बळी पडून अनेकांनी मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले. काहींना काही महिने पैसे मिळाले, तर काही गुंतवणूकदारांना काहीच पैसे मिळाले नाहीत. सोमवारी सकाळी कंपनीचे दादर येथील मुख्य कार्यालय आणि भाईंदर येथील शोरूम अचानक बंद झाल्याची गुंतवणूकदारांना माहिती मिळताच आपल्या गुंतवणुकीची चौकशी करण्यासाठी लोकांनी शोरूम बाहेर मोठी गर्दी केली. मात्र, शोरूम बंद असल्याने नागरिकांमध्ये गोंधळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले. मीरा-भाईंदर परिसरातील हजारो गुंतवणूकदारांनी टोरस कंपनीत गुंतवणूक केली असल्याचे सांगितले जात आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शोरूम बाहेर काहींनी निदर्शने केली, तर काहींनी पोलिसांत तक्रारी केल्या आहेत.