मुंबई : दररोज ५५ लाख प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळ गेली ७६ वर्ष काम करीत असून रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी चालकांचे सुयोग्य प्रशिक्षण, त्यांचे मानसिक आरोग्य सुदढ करणे या बरोबरच तांत्रिकदृष्ट्या निर्दोष बसेंस उपलब्ध करून देणे या त्रिसुत्रीवर यापुढे भर देण्यात येत असून, प्रवाशांची सुरक्षितता हेच एसटीचे अंतिम ध्येय राहील, असे प्रतिपादन एसटीचे अध्यक्ष आमदार भरत गोगावले यांनी केले.
भंडारा व नाशिक येथे झालेल्या एसटीच्या अपघाताबरोबरच नुकत्याच बेस्ट चालकाकडून घडलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष गोगावले यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. चालक प्रशिक्षण, चालकांची निवड चाचणी, चालकाचे मानसिक आरोग्य याबरोबरच तांत्रिकदृष्ट्या निर्दोष वाहन उपलब्ध करून देण्याबद्दल सखोल चर्चा करण्यात आली.
वेळेत बस पुरवठा न करणाऱ्यांना नोटीस
सध्या एसटी महामंडळाकडे १४००० बसेस असून, उपलब्ध प्रवाशांसासाठी त्या अत्यंत अपुऱ्या पडत आहेत. त्यापैकी अनेक बसेस अत्यंत जुन्या झाल्या आहेत. तसेच काही बसेस कालबाह्य होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेता निविदा पात्र संस्थांनी नवीन बसेस वेळेत पुरवठा करणे अत्यंत आवश्यक होते. तथापी, त्या संस्था बसेस पुरविण्याबद्दल सक्षम का नाहीत? याची शहानिशा करून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवावी, असे निर्देश अध्यक्ष गोगावले यांनी एसटी प्रशासनाला दिले.