मुंबई : वर्षभरापूर्वी सेवेत आलेला अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशिवा अटल सेतू वाहन धारकांसाठी उपयुक्त ठरला आहे. वाहनधारकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या अटल सेतूवर आकारण्यात येणारा २५० रुपयांचा टोल पुढील वर्षभरासाठी कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे.
पूल प्रवासी सेवेत दाखल होण्याआधी २५० रुपये टोल आकारणीचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुढील ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत २५० टोल आकारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या पुलावरून दररोज सरासरी २३ हजार वाहनांची वर्दळ सुरू आहे.
असा आहे टोल
एका चारचाकी वाहनासाठी एकेरी वाहतुकीसाठी २५० रुपये, तर परतीचा प्रवास असल्यास ३७५ रुपये टोल आकारण्यात येतो.
१८ हजार कोटींचा पूल
पुलाच्या बांधकामासाठी १७ हजार ८४० कोटी रुपये खर्च आला. त्यासाठी १ लाख ७७ हजार ९०३ मेट्रिक टन स्टील आणि ५ लाख ४ हजार २५३ मेट्रिक टन सिमेंट वापरण्यात आले आहे.