वसई : वसई-विरार शहरात सलग अनेक दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले असून व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागले आहे. गेल्या काही दिवसांतील विविध दुर्घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाल्याने पावसाने मानवी जीवितहानीही घडवून आणली आहे. शहरातील अनेक बाजारपेठा, औद्योगिक वसाहती, दुकाने, गोदामे आणि कारखान्यांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात माल, यंत्रसामग्री आणि साहित्याचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार हे नुकसान कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या काही दिवसांतील अतिवृष्टीमुळे वसई-विरारमधील सखल भाग जलमय झाले. अनेक निवासी संकुले, शॉपिंग सेंटर्स आणि इमारतींच्या तळमजल्यात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. पूरस्थितीमुळे वीजपुरवठा, मोबाईल नेटवर्क, इंटरनेट सेवा, पाणीपुरवठा आणि वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. सुरक्षेच्या कारणास्तव काही भागांतील वीजपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आल्याने पिण्याच्या पाण्याचाही पुरवठा प्रभावित झाला. पश्चिम रेल्वेची वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती.
शासनाकडे नुकसानग्रस्त व्यापारी आणि उद्योजकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे. तसेच शहरातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी आणि नुकसानग्रस्तांना आर्थिक आधार देण्यासाठी मुख्यमंत्री यांनी विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशीही त्यांनी मागणी केली.अजीव पाटील, महापौर
यंदा अल्पावधीतच वार्षिक सरासरीच्या दोन तृतीयांश इतका पाऊस झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. हा नैसर्गिक आपत्तीचा परिणाम असून परिस्थिती सामान्य होण्यासाठी काही काळ लागेल. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या समन्वयातून शहर पुन्हा पूर्वपदावर येईल.नारायण मानकर, माजी महापौर
वसई-विरारमधील महापूर आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती ही केवळ एखाद्या व्यक्तीमुळे किंवा एका कारणामुळे उद्भवलेली नसून, या संकटावर सर्वांनी एकत्रितपणे मात करण्याची गरज आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या सर्व विभागांची लवकरच उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला जाईल तसेच शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यात येईल.गणेश नाईक, वनमंत्री तथा पालकमंत्री
मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वसई-विरार नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महावितरणने वीजपुरवठा तात्पुरता बंद ठेवला होता. मात्र, पूरस्थिती ओसरताच महावितरणने अवघ्या १२ तासांत दोन लाखांहून अधिक वीज ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केल्याची माहिती कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी दिली.
वसई-भाईंदर रो-रो सेवा पूर्ववत
गेल्या तीन दिवसांपासून बंद ठेवण्यात आलेली वसई-भाईंदर रो-रो सेवा गुरुवारी पुन्हा सुरू करण्यात आली. हवामानात सुधारणा झाल्यानंतर प्रशासनाने सुरक्षा पाहणी करून सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतल्याने हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.