लखनऊ : हाथरस चेंगराचेंगरीमागे मोठे कारस्थान असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे या दुर्घटनेची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आपल्या अहवालात नमूद केल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने अहवालाचा आधार घेत मंगळवारी स्थानिक उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम), परिमंडळ अधिकारी स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडली आणि त्यामध्ये १२१ जणांचा मृत्यू झाला. चेंगराचेंगरीला आयोजक जबाबदार असल्याचा ठपकाही अहवालामध्ये ठेवण्यात आला आहे. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आयोजकांनी योग्य व्यवस्था केली नाही, असेही अहवालात नमूद करण्यात आले असून प्रशासनाची जबाबदारीही निश्चित केली आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
स्थानिक पोलीस आणि प्रशासनाने या कार्यक्रमाकडे गांभीर्याने पाहिले नाही आणि ज्येष्ठ अधिकाऱ्यांना योग्य माहिती पुरविली नाही. ही दुर्घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांकडून मिळालेली माहिती आणि पुरावे यांच्या आधारे एसआयटीने प्राथमिक तपासामध्ये आयोजकांना जबाबदार धरले आहे, या दुर्घटनेमागे मोठे कारस्थान असण्याची शक्यता नाकारता येत नाही, या घटनेची सखोल चौकशी गरजेचे असल्याचे मतही एसआयटीने व्यक्त केले आहे.
सत्संगसाठी जमलेल्या गर्दीत काही अज्ञात व्यक्ती विषारी घटक घेऊन आले होते आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याचा दावा भोले बाबाच्या वकिलांनी केला होता. कार्यक्रमाचे आयोजक आणि तहसील-स्तरावरील पोलीस आणि प्रशासन दोषी असल्याचे एसआयटीला आढळले.