नवी दिल्ली : २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरल्यास वाहनाच्या प्रकार आणि वयानुसार इंधन कार्यक्षमता (मायलेज) २ ते ६ टक्क्यांनी कमी होऊ शकते, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत दिली. मात्र, ई-२० इंधनामुळे इंजिनमध्ये कोणतेही बिघाड होत असल्याचे चाचण्यांमध्ये आढळले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
ई-२० इंधनामुळे इ-१० पेट्रोलच्या तुलनेत वाहनाला अधिक चांगला वेग, सुधारित ड्रायव्हिंग अनुभव आणि सुमारे ३० टक्के कमी कार्बन उत्सर्जन मिळते, असे त्यांनी एका लेखी उत्तरात सांगितले.
ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांनी संयुक्तपणे दुचाकी व चारचाकी वाहनांवर इथेनॉलमिश्रीत पेट्रोलचा परिणाम अभ्यासला.
देशभरात२० कोटींहून अधिक दुचाकी आणि ३ कोटींहून अधिक पेट्रोल कार इथेनॉलमिश्रित इंधनावर चालत असून यामुळे इंजिन निकामी झाल्याचा किंवा वाहन बंद पडल्याचा कोणताही अधिकृत पुरावा उपलब्ध नसल्याचे गडकरी यांनी सांगितले.तसेच, या पेट्रोलमुळे गंज, झीज किंवा वाहनाच्या आयुष्यात घट झाल्याचे कोणताही निष्कर्ष उपलब्ध नाही असा निष्कर्ष उपलब्ध झालेला नाही, असे त्यांनी नमूद केले.
रबर पार्ट्सची खराबी
बीएस-३ मानक गाड्यांमध्ये ई-२० पेट्रोल (२० टक्के इथेनॉल मिश्रित) वापरल्यास काही रबर पार्ट्स व गॅस्केट बदलावे लागू शकतात, असे गडकरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात राज्यसभेत मान्य केले. मात्र यामुळे इंजिनमध्ये बदल करण्याची गरज पडणार नसून हे पार्ट्स सर्व्हिसिंग दरम्यान सहज बदलता येतात, असेही सरकारने नमूद केले.