नवी दिल्ली : केंद्र सरकारने केरळचे नाव ‘केरळम’ करण्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आता दिल्ली आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या नामांतराची चर्चा सुरू झाली आहे. केंद्राकडे प्रस्ताव पाठविला असतानाही पश्चिम बंगालचे नाव बदलले नाही, त्यावरून राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तर दिल्लीचे नाव बदलण्यासाठी भाजपच्या खासदाराने केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठविले आहे.
दिल्लीचे प्राचीन वैभव जपण्यासाठी दिल्लीचे नाव ‘इंद्रप्रस्थ’ करण्यात यावे, अशी आग्रही मागणी भाजपचे खासदार राजीव खंडेलवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. दिल्लीत आजही पुराणा किल्ला परिसरामध्ये उत्खननादरम्यान, इंद्रप्रस्थाचे अवशेष सापडल्याचे अनेक इतिहासकरांचे म्हणणे आहे. अनेक संघटना आणि नागरिकांकडूनही दिल्लीचे नाव बदलण्याची सातत्याने मागणी केली जात आहे.
नाव संयुक्तिक
दिल्लीचा संबंध पौराणिक काळातील इंद्रप्रस्थ नगरीशी आहे, पांडवांनी वसवलेली ही नगरी सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. दिल्ली हे नाव बदलून गौरवशाली इतिहासाचे प्रतीक असलेले ‘इंद्रप्रस्थ’ हे नाव अधिक संयुक्तिक ठरेल, असा दावा खंडेलवाल यांनी केला.