नवी दिल्ली : आगामी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोग घरोघरी जाऊन मतदार यादीप्रमाणे मतदारांची सत्यता तपासण्याचा विचार निवडणूक आयोग करत आहे. निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व विश्वासार्ह बनवण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे.
गेल्या काही वर्षांत मतदार यादीतून नाव रद्द होणे किंवा चुकीच्या पद्धतीने जोडले गेल्याने अनेक राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांकडून निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मतदार यादीत हेराफेरी केल्याचा फायदा सत्ताधारी पक्षाला होत आहे, असा आरोप काँग्रेससमवेत अनेक पक्षांनी केला.
राजकीय पक्षांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना उत्तर देताना निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की, ही प्रक्रिया राजशिष्टाचार व सर्व राजकीय पक्षांच्या देखरेखीखाली बनवली जाते. तरीही आयोगावर मनमानीपणे मतदार वाढवण्याचा आरोप केला जातो. निवडणूक आयोगाची यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी व दोषमुक्त करण्यासाठी मतदार यादी अधिकाधिक पारदर्शी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मतदार यादीबाबत कठोर सुधारणा यापूर्वीच केल्या आहेत.
बिहार निवडणूक या वर्षाअखेरपर्यंत होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यामुळे मतदार यादी हा मुद्दा महत्वाचा बनला आहे. बिहारमध्ये सध्या जदयू, भाजप व हिंदुस्थानी अवामी मोर्चाची रालोआ आघाडी सत्तेवर आहे. तर विरोधी पक्षामध्ये राजद व काँग्रेससोबत अनेक राजकीय पक्ष आहेत.
या तपासणीत काय होणार?
-प्रत्येक घरात जाऊन नाव, वय, फोटो आदींची तपासणी होणार.
-चुकीच्या मतदाराचे नाव काढले जाईल.
-नवीन मतदाराचे नाव यादीत नोंदवले जाईल.
-मृत किंवा स्थलांतरित लोकांचे नाव हटवणार.