राष्ट्रीय

काँग्रेस खासदार गोगोईंंच्या पत्नीचे ISI शी संबंध; आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा सनसनाटी आरोप

काँग्रेस खासदार गौरव गोगोई, त्यांची ब्रिटिश पत्नी एलिझाबेथ कोलबर्न आणि पाकिस्तानी नागरिक अली तौकीर शेख यांचे ‘आयएसआय’शी अत्यंत घनिष्ट संबंध आहेत, असा सनसनाटी आरोप आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी केला.

Swapnil S

गुवाहाटी : काँग्रेस खासदार गौरव गोगोई, त्यांची ब्रिटिश पत्नी एलिझाबेथ कोलबर्न आणि पाकिस्तानी नागरिक अली तौकीर शेख यांचे ‘आयएसआय’शी अत्यंत घनिष्ट संबंध आहेत, असा सनसनाटी आरोप आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी केला.

येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, शेजारील देशाला गुप्तपणे गुप्तचर विभागातील माहिती पुरवण्यात आली.

गोगोई यांच्या पत्नी कोलबर्न भारतात कार्यरत असताना त्यांच्या पगाराच्या देयकासाठी परकीय योगदान (नियमन) कायद्याचे (एफसीआरए) उल्लंघन करण्यात आले. त्यांच्या मते, गोगोई यांनी २०१३ मध्ये पाकिस्तानला ‘अत्यंत गोपनीय’ भेट दिली होती आणि त्या काळात त्यांनी तेथे ‘काही प्रकारचे प्रशिक्षण’ घेतले असावे, अशी शंका आहे, असा आरोप त्यांनी केला.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘गौरव गोगोई, एलिझाबेथ कोलबर्न आणि अली तौकीर शेख यांच्यात अधिक घनिष्ट संबंध असल्याचा आमचा विश्वास आहे. एलिझाबेथ आणि अली तौकीर शेख हे एका आंतरराष्ट्रीय कटाचा भाग होते, असे आम्हाला वाटते.’ भारत सरकारला डावलून त्यांनी स्थानिक महानगरपालिका संस्थांसोबत काम केले आणि त्यामुळे या प्रकरणाची चौकशी आसाम पोलिसांकडून होऊ शकत नाही. म्हणूनच, केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राष्ट्रीय पातळीवरील चौकशीची शिफारस करण्यात आली आहे.

एलिझाबेथ यांनी पाकिस्तानमध्ये शेख यांच्या ‘लीड पाकिस्तान’ या संस्थेत काम केले. त्यानंतर त्यांची बदली भारतात झाली आणि त्या येथेही त्याच संस्थेत कार्यरत होत्या. मात्र, त्यांचा पगार अली तौकीर शेखच देत होता,’ असे सरमा म्हणाले. ‘लीड पाकिस्तान’कडून ‘लीड इंडिया’ला पैसे पाठवले जात आणि ‘लीड इंडिया’कडून एफसीआरए नियमांना बगल देत एलिझाबेथ यांना देयक करण्यात येत होते, असा आरोप त्यांनी केला.

पाकिस्तानी संस्था भारतीय संस्थेला देणगी देऊ शकत नाही, कारण तो शत्रूराष्ट्र आहे. कदाचित यूपीए सरकारच्या काळात विशेष परवानगी घेण्यात आली असावी,’ असेही त्यांनी नमूद केले. भारतात काम केल्यानंतर कोलबर्न यांनी भारताशी संबंधित माहिती संकलित करून शेख यांना अहवाल पाठवले, असा आरोपही मुख्यमंत्री यांनी केला.

नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर एलिझाबेथ यांनी हवामानविषयक कृतीबाबत आयबीच्या स्रोतांकडून माहिती मिळवली आणि शेख यांना ४५ पानी अहवाल पाठवला,’ असा दावा सरमा यांनी केला. ‘लीड इंडिया’सोबत काम करत असताना कोलबर्न सहा वेळा इस्लामाबादला गेल्या, तसेच दुसऱ्या एका स्वयंसेवी संस्थेत रुजू झाल्यानंतर तीन वेळा पाकिस्तानला भेट दिली, असेही त्यांनी सांगितले.

या भेटीचा गाजावाजा होऊ नये म्हणून त्या केवळ अटारी सीमेवरूनच पाकिस्तानात जात असत. त्यांनी कधीही विमानाने प्रवास केला नाही,’ असे सरमा म्हणाले. एफसीआरएचे उल्लंघन करून थेट पाकिस्तानी निधी मिळवणे सोपे नाही, त्यामुळे यूपीए सरकारच्या व्यवस्थेशी ‘अतिशय जवळचा आणखी एक हँडलर’ असावा, असा त्यांचा संशय आहे.

सी ग्रेड सिनेमापेक्षा वाईट-गोगोई

या आरोपांना प्रतिक्रिया देताना गौरव गोगोई म्हणाले की, ‘दिल्ली आणि आसाममधील पत्रकारांना शतकातील सर्वात फ्लॉप पत्रकार परिषद सहन करावी लागली, याची मला कीव येते. ती सी-ग्रेड सिनेमापेक्षाही वाईट होती.’ आसामचे ‘स्वयंघोषित राजकीय चतुर’ मुख्यमंत्री यांनी ‘सर्वात बिनबुडाचे आणि खोटे मुद्दे’ मांडल्याचा आरोपही त्यांनी केला.

पाकिस्तानने पलटी मारलीच! भारताविरुद्धच्या सामन्यावरील बहिष्कार मागे; नक्वी म्हणतात - "हमने अपने लिए कुछ नहीं किया"

डोंबिवली : गर्दीमुळे पुन्हा एक बळी; परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू

राज्य सरकारमध्ये ७० हजार पदांची लवकरच भरती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Mumbai : विद्याविहारमध्ये तीन वर्षांच्या चिमुकल्याला पळवण्याचा प्रयत्न; रहिवाशांनी चोप देत आरोपी महिलेला केले पोलिसांच्या हवाली

कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! महाशिवरात्रीनिमित्त CSMT-सावंतवाडी रोड विशेष ट्रेन; वाचा वेळापत्रक