(फोटो सौजन्य - PTI)
राष्ट्रीय

सैनींवर विश्वास, खट्टरांचे त्यागपत्र!

Swapnil S

चंदिगड : हरयाणाचे नवनियुक्त मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी बुधवारी राज्य विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. सभागृहात ठराव सादर केल्यानंतर त्यावर दोन तास चर्चा झाली आणि तो आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. दरम्यान, माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी बुधवारी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. खट्टर कर्नाल मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते.

हरयाणातील भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि दुष्यंत चौटाला यांच्या नेतृत्वाखालील जननायक जनता पार्टी (जेजेपी) यांची युती संपुष्टात आल्यानंतर खट्टर यांच्याकडून मुख्यमंत्रीपद सैनी यांच्याकडे गेले. जेजेपीने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने भाजप सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करणे गरजेचे झाले. हरयाणा विधानसभेतील एकूण ९० जागांपैकी भाजपच्या ४१, काँग्रेसच्या ३०, जेजेपीच्या १०, इंडियन नॅशनल लोक दलाची १ आणि हरयाणा लोकहित पक्षाची १ जागा असून, सभागृहात ७ अपक्ष आमदार आहेत. २०१९ सालच्या निवडणुकीनंतर सरकार स्थापन करताना भाजपला बहुमतासाठी ६ जागा कमी पडत होत्या.

तेव्हा भाजपला जेजेपीने पाठिंबा दिला होता. आता ही युती विस्कटल्यानंतर भाजपला पुन्हा बहुमत सिद्ध करावे लागले. बुधवारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी जेजेपीने पक्षादेश काढून त्यांच्या १० आमदारांना सभागृहात गैरहजर राहण्यास सांगितले होते. पण प्रत्यक्ष मतदानावेळी जेजेपीच्या ५ आमदारांनी सभागृह सोडले. सभागृहातील सातपैकी सहा अपक्ष आमदार आणि हरयाणा लोकहित पक्षाचे एकमेव आमदार गोपाल कांडा यांनी भाजपला पाठिंबा दिला. दोन तासांच्या चर्चेनंतर आवाजी मतदानात भाजपने विश्वासदर्शक ठराव जिंकला.

हरयाणाच्या जनतेची सेवा करत राहणार - खट्टर

सैनी यांच्या नव्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर माजी मुख्यमंत्री खट्टर यांनी विधानसभेचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. ते प्रतिनिधीत्व करत असलेल्या कर्नाल मतदारसंघाची यापुढे सैनी काळजी घेतील, असे ते म्हणाले. मी गेली साडेनऊ वर्षे सभागृहाचे नेतृत्व केले. आता मी राजीनामा देत आहे. मात्र, माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत मी हरयाणाच्या जनतेची सेवा करत राहीन, असे खट्टर यांनी सांगितले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस