लखीमपूर खेरी (उत्तर प्रदेश): "माझा मुलगा आज जिवंत असता, तर हा दिवस पाहू शकला असता," अशा शब्दांत अनुप मिश्रा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर त्यांचा २१ वर्षीय मुलगा रितीक मिश्रा याने आत्महत्या केली होती. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे डोळे भरून आले.
अनूप मिश्रा म्हणाले, रितिकचा हा नीट परीक्षेचा तिसरा प्रयत्न होता. प्रश्नपत्रिका फुटीचे वृत्त समोर आल्यानंतर तो पूर्णपणे खचून गेला. त्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आल्याने तो आणखी निराश झाला आणि १४ मे रोजी फेरपरीक्षेची घोषणा होण्याच्या आदल्या दिवशी, त्याने आत्महत्या केली.
धर्मेंद्र प्रधान यांनी यापूर्वीच राजीनामा दिला असता, तर २० जुलै रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेली पोलिस कारवाई टाळता आली असती, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.
देशातील तरुणांच्या चिकाटीचे कौतुक करताना ते म्हणाले, "तरुणांच्या निर्धारामुळेच संपूर्ण देशाचे लक्ष विद्यमान परीक्षा व्यवस्थेकडे वेधले गेले आणि सरकारला शिक्षण व्यवस्थेत बदल करण्यास भाग पाडले."
या आंदोलनाचा व्यापक परिणाम अधोरेखित करताना मिश्रा म्हणाले, "माझा मुलगा हे बदल पाहण्यासाठी आज हयात नाही, ही वेदना कायम राहील. मात्र या आंदोलनामुळे देशातील पुढील पिढीला अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह परीक्षा व्यवस्था मिळाली, विद्यार्थ्यांना नैराश्यापासून वाचवता आले आणि इतर कुटुंबांवर आमच्यासारखी वेळ आली नाही, तर त्यातून आम्हाला काही प्रमाणात समाधान मिळेल."
भरपाई होऊ शकत नाही
केंद्र सरकारने आत्महत्या केलेल्या २१ विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला असला, तरी कोणतीही भरपाई त्यांच्या मुलाच्या मृत्यूची पोकळी भरून काढू शकत नाही, असे मिश्रा यांनी नमूद केले.