नवी दिल्ली : भारताच्या वार्षिक संरक्षण निर्यातीने २०२५-२६ या आर्थिक वर्षात ३८,४२४ कोटी रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर गाठला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यामध्ये तब्बल ६२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली असल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी दिली.
भारताचा विश्वास वाढला
संरक्षण निर्यातीतील ही ‘मोठी झेप’ भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमतेवर जागतिक स्तरावर वाढत असलेल्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे राजनाथ सिंह यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटले आहे. ते म्हणाले की, भारत संरक्षण निर्यातीत यशाची एक प्रभावी गाथा लिहित आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात संरक्षण निर्यातीने ३८,४२४ कोटी रुपयांचा नवा विक्रम प्रस्थापित केला असून, मागील वर्षाच्या तुलनेत यात ६२.६६ टक्के इतकी दमदार वाढ झाली आहे.
आकडेवारी आणि वैशिष्ट्ये
मागील वर्षाच्या तुलनेत निर्यातीत १४,८०२ कोटी रुपयांची भर पडली आहे. एकूण निर्यातीत संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांचा वाटा ५४.८४ टक्के, तर खासगी उद्योगांचा वाटा ४५.१६ टक्के इतका आहे. राजनाथ सिंह यांच्या मते, हा टप्पा भारताच्या प्रगत उत्पादन क्षमता आणि स्वावलंबी संरक्षण परिसंस्थेच्या सामर्थ्याचे दर्शन घडवतो. ही कामगिरी भारताला संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.