रुरकी : भारताची सध्याची ४.०१५ लाख कोटी डॉलर असलेली सकल देशांतर्गत उत्पादनाची (जीडीपी) अर्थव्यवस्था पुढील २० वर्षांत ३८ लाख कोटी डॉलरपर्यंत पोहोचेल, असा विश्वास राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी शनिवारी व्यक्त केला.
भारतीय तंत्रज्ञान संस्था, रुरकीच्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित करताना डोवाल म्हणाले की, परिवर्तनाच्या युगात जगण्याचे भाग्य आजच्या विद्यार्थ्यांना लाभले आहे. त्यांच्या भविष्यात मोठ्या संधी उपलब्ध आहेत.
भगवान रामाचे उदाहरण देत डोवाल यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यात धाडसी बनण्याचे आवाहन केले. ऋषी विश्वामित्रांनी राक्षसांचा संहार करण्यासाठी भगवान रामांची निवड त्यांच्या धाडसी स्वभावामुळे केली होती, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवल यांनी सांगितले.
भारतात मोठे बदल घडत आहेत आणि देश एका वैभवशाली भविष्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पंतप्रधानांनी २०४७ पर्यंतच्या कालखंडाला 'अमृत काळ' असे संबोधले आहे. हा खरोखरच अद्भुत अमृत काळ आहे. भारताची सध्याची जीडीपी ४.०१५ लाख कोटी डॉलर आहे आणि पुढील २० वर्षांत ती ३८ लाख कोटी डॉलरपर्यंत पोहोचेल," असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांनी नमूद केले.
आजची पिढी ही मुबलक संधी उपलब्ध असलेली सर्वाधिक भाग्यवान पिढी आहे, असे सांगताना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल म्हणाले, मागील पिढ्यांना अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले. मात्र, आज तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि नवोन्मेषाचे युग आहे. यामुळे समाजाच्या प्रगतीला चालना मिळत आहे आणि तरुणांकडे प्रगतीसाठी अनेक दशके उपलब्ध आहेत.
नेतृत्व करण्यासाठी निर्णयक्षमता आणि स्वतःची विचारधारा किंवा कार्यपद्धती विकसित करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी सांगितले.
तुम्ही निर्णय घेणारे नसाल, तर कधीही नेता बनू शकणार नाही. तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. तुम्हाला तुमची स्वतःची कार्यपद्धती विकसित करावी लागेल, असे ते म्हणाले.
काळातील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या सिक्कीममधील नियुक्तीचा एक किस्साही विद्यार्थ्यांसोबत शेअर केला. यावेळी एका शेर्पाकडून आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तीन मंत्र शिकल्याचे त्यांनी सांगितले.
आयुष्याचे नियोजन हवे
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांच्या मते, पहिला मंत्र म्हणजे आपण नकाशावर नेमके कुठे आहोत, हे माहीत असणे; दुसरा म्हणजे आपल्याला कुठे जायचे आहे, हे माहीत असणे; तर तिसरा मंत्र म्हणजे त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आणि पुन्हा परतण्यासाठी कोणता मार्ग अवलंबायचा, हे माहीत असणे.