नवी दिल्ली : ऊर्जेचा ताण, सरासरीपेक्षा कमी मान्सून आणि जागतिक विकास दरातील मंदी यामुळे भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) विकास दर चालू आर्थिक वर्षात ६.६ टक्क्यांपर्यंत खाली येईल, अशी भीती एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जने बुधवारी व्यक्त केली.
भारतीय अर्थव्यवस्थेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात ७.७ टक्के आणि २०२४-२५ मध्ये ७.१ टक्के विकास दर नोंदवला होता.
आम्ही अंदाज वर्तवत आहोत की मार्च २०२७ ला संपणाऱ्या आर्थिक वर्षात वास्तविक जीडीपी विकास दर ६.६ टक्क्यांपर्यंत खाली येईल. आर्थिक वर्ष २०२६ मधील ७.७ टक्क्यांच्या तुलनेत ऊर्जेचा ताण, कमी पावसाची शक्यता आणि जागतिक मंदीमुळे ही घट दिसून येईल, असे एस अँड पीने अहवालात म्हटले आहे.
एस अँड पी ने असा अंदाज वर्तवला आहे की, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत व्याजदरात वाढ होऊ शकते. महागाईमुळे ग्राहकांची क्रयशक्ती कमी होत असल्याने आर्थिक विकासावरही त्याचा नकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
एस अँड पी चा ६.६ टक्के विकास दराचा अंदाज रिझर्व्ह बँकेच्या अंदाजाशी जुळणारा आहे. एल निनोच्या प्रभावामुळे पावसावर परिणाम झाला असून २२ जूनपर्यंत पावसाची तूट ४३ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. कमी पावसामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने राज्यनिहाय आपत्कालीन योजना तयार केल्या आहेत. यामध्ये पर्यायी पिकांच्या लागवडीची शिफारस करण्यात आली आहे.
ऊर्जेवरील ताण राहणार
एस अँड पी च्या 'इकोनॉमिक आउटलुक आशिया-पॅसिफिक क्यू ३ २०२६ : एआय-एक्सपोज्ड मार्केट्स टू आउटपरफॉर्म' या अहवालानुसार, पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेला ऊर्जेचा ताण उद्योगांवर परिणाम करत आहे. यामुळे कच्च्या मालाच्या खर्चात वाढ आणि पुरवठ्याच्या वेळेत विलंब होत आहे.
महागाईवर होणार परिणाम
भारत गरजेच्या ८८ टक्के कच्च्या तेलाची आयात करतो. यामुळे जागतिक किमती वाढल्यास आयात बिल वाढते आणि महागाई भडकते.
खतांच्या वाढत्या किमती अन्न उत्पादनावर परिणाम करत असून अन्नधान्याच्या किमती वाढवत आहेत. उत्पादक ऊर्जेचा वाढलेला खर्च ग्राहकांवर टाकत आहेत. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत वाढ झाल्यामुळे चालू आर्थिक वर्षात महागाई ५.१ टक्क्यांपर्यंत वाढू शकते.