राष्ट्रीय

चीनच्या नागरिकांसाठीची पर्यटन व्हिसाबंदी अखेर मागे

गलवान खोऱ्यात चीन आणि भारतीय लष्करामध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर भारत सरकारने चीनच्या नागरिकांसाठी व्हिसा बंदीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय पाच वर्षांनी मागे घेण्यात आला असून, २४ जुलै २०२५ पासून चिनी नागरिकांना पर्यटन व्हिसा देण्यास सुरूवात होणार आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात चीन आणि भारतीय लष्करामध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर भारत सरकारने चीनच्या नागरिकांसाठी व्हिसा बंदीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय पाच वर्षांनी मागे घेण्यात आला असून, २४ जुलै २०२५ पासून चिनी नागरिकांना पर्यटन व्हिसा देण्यास सुरूवात होणार आहे.

गलवान खोऱ्यामध्ये २०२० मध्ये भारत आणि चीनच्या जवानांमध्ये संघर्ष झाला होता. या संघर्षामध्ये भारताचे जवान शहीद झाले होते. चीनचेही काही जवान मारले गेले होते. त्यानंतर भारताने चिनी नागरिकांना दिल्या जाणाऱ्या पर्यटन व्हिसावर बंदी घातली होती.

चिनी नागरिकांना पुन्हा पर्यटन व्हिसा देण्याबद्दल केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची घोषणा भारतीय दूतावासाने केली. भारताच्या बीजिंग येथील दूतावासाकडून याची माहिती देण्यात आली. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मेस्त्री हे दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर आहेत. त्यांनी या निर्णयाबद्दलची घोषणा केली.

गलवान खोऱ्यात झालेल्या लष्करी संघर्षानंतर भारत आणि चीन यांच्यातील संबंध प्रचंड ताणले गेले होते. ते हळूहळू पूर्ववत होऊ लागले आहेत. दोन्ही देशांमध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर चर्चा सुरू असून, परिस्थिती सुधारण्याच्या दिशेने पावले टाकली जात आहेत. या वर्षाच्या सुरूवातीला दोन्ही देशांनी हवाई वाहतूक सुरू करणे, व्हिसा देणे आणि भारतीय यात्रेकरूंना कैलास मानसरोवर यात्रेसाठी परवानगी देणे यासंदर्भात चर्चा करून मान्यता दिली. दोन्ही देशांनी संबंध पूर्ववत करण्यावर जोर दिला असून, त्याच अनुषंगाने आता भारताने व्हिसा बंदीचा निर्णय मागे घेतला आहे.

मोदींनी मोडला इंदिरा गांधींचा ‘तो’ विक्रम; सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याबाबत नेहरूंनंतर दुसऱ्या स्थानी

न्या. वर्मांवरील महाभियोग प्रस्ताव प्रथम लोकसभेत मांडणार

अश्लील कंटेट प्रसारित करणाऱ्या २५ ओटीटी प्लॅटफॉर्मवर केंद्राची बंदी

शाळेचे छत कोसळून ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दिल्लीत भेटीगाठीचे सत्र