नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने ‘प्रहार’ या नावाने देशाचे पहिले व्यापक दहशतवादविरोधी धोरण जारी केले आहे. त्यामध्ये सीमापार दहशतवादाचा उल्लेख असून गुन्हेगारी हॅकर्स आणि सायबर हल्ल्यांमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचाही उल्लेख करण्यात आला आहे.
देशाला भूमी, जल आणि वायू या तीनही मार्गांनी दहशतवादी धोक्याचा सामना करावा लागतो. भारत दहशतवादाला कोणत्याही विशिष्ट धर्म, वंश, राष्ट्रीयत्व अथवा संस्कृतीशी जोडत नाही. दहशतवादी गट रसद आणि भरतीसाठी संघटित गुन्हेगारी नेटवर्कचा वापर वाढत्या प्रमाणात करीत आहेत, असे धोरणात म्हटले आहे.
दहशतवादी गट भारतीय तरुणांना भरती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकदा ओळख पटल्यानंतर पोलीस अशा व्यक्तींविरुद्ध कारवाई करतात, तसेच सामाजिक आणि धार्मिक नेत्यांची भूमिकाही धोरणात अधोरेखित करण्यात आली आहे.
‘अल-कायदा’ आणि ‘आयसिस’ यासारख्या जागतिक दहशतवादी गटांच्या नावांचा उल्लेख करीत धोरणात म्हटले आहे की, त्यांनी स्लीपर सेलद्वारे भारतामध्ये हिंसाचार भडकविण्याचा प्रयत्न केला आहे.