नवी दिल्ली : भारताची अखंड वेलचीची निर्यात गेल्या दोन वर्षांत लक्षणीयरीत्या वाढली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील १३ कोटी १९ लाख अमेरिकन डॉलरच्या तुलनेत वर्ष २०२५-२६ मध्ये ही निर्यात तिप्पट होऊन ४३ कोटी ६८ लाख डॉलरवर पोहोचली आहे.
वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, या कालावधीत केवळ निर्यातीचे मूल्यच नाही, तर वेलचीच्या एकूण निर्यातीचे प्रमाण दुप्पट झाले आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या वेलचीच्या सुगंधाची, गुणवत्तेची आणि शुद्धतेची जागतिक बाजारपेठेत मोठी ख्याती आहे. त्यामुळेच परदेशी खरेदीदारांकडून भारतीय वेलचीला अधिक पसंती दिली जात असून, दर्जेदार मसाल्यांच्या वाढत्या मागणीमुळे या निर्यातीत इतकी मोठी वाढ झाली आहे. नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, बहरीन, कॅनडा, चीन, इजिप्त आणि इराण या देशांमध्येही भारतातून वेलचीची मोठ्या प्रमाणावर आयात केली जाते.
छोटी वेलची (हिरवी वेलची) प्रामुख्याने भारताच्या दक्षिणेकडील पश्चिम घाटाच्या भागात पिकवली जाते. केरळ हे देशातील सर्वात मोठे वेलची उत्पादक राज्य असून देशाच्या एकूण पुरवठ्यापैकी ५६ ते ५८ टक्के वाटा एकट्या केरळचा आहे.
प्रमुख आयातदार देश
संयुक्त अरब अमिराती : १३ कोटी ५२ लाख २० हजार अमेरिकन डॉलर
सौदी अरेबिया : १२ कोटी ५१ लाख ६० हजार अमेरिकन डॉलर
बांगलादेश : ४ कोटी ७७ लाख १० हजार अमेरिकन डॉलर
कुवेत : २ कोटी अमेरिकन डॉलर
इराक : १ कोटी ३७ लाख १० हजार अमेरिकन डॉलर
मलेशिया : ८४ लाख ८० हजार अमेरिकन डॉलर