PM
राष्ट्रीय

मटणाच्या नळीने घेतला लग्नाचा बळी! शब्द न पाळल्याने हैदराबादमध्ये नवरदेवाचा लग्न करण्यास नकार

पोलिसांनीही दोन्ही पक्षांची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र वराचे कुटुंबीय काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

Swapnil S

तेलंगणा : लग्नात फक्त दोन जिवांचं मिलन होत नाही तर दोन परिवारांतही सख्य निर्माण होत असतं. अनेकदा लग्नात छोट्या-मोठ्या कारणावरून खटके उडत असतात. हुंड्यामुळे लग्न मोडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता तेलंगणामध्ये मटणाच्या नळीने एका लग्नाचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. नवरा मुलाकडील मंडळींना लग्नात मटणाची नळी न दिल्याने दोन्हीकडच्या मंडळींमधील वाद विकोपाला गेला, अन् लग्न मोडून नवरदेवाचं वऱ्हाड माघारी परतलं.

तेलंगणातल्या निजामाबाद येथे राहणाऱ्या तरुणीचे जगतियाल जिल्ह्यात राहणाऱ्या तरुणाशी लग्न ठरले होते. लग्नात वधू पक्षाने वऱ्हाडींसाठी मांसाहारी जेवणाची व्यवस्था केली होती. लग्नामध्ये सर्व काही सुरळीत सुरू होते. मांसाहारी जेवणाची व्यवस्था असल्याने वऱ्हाडी मंडळीही त्यावर ताव मारून तुटून पडली होती. अचानक वऱ्हाडातल्या काही लोकांनी जेवणात मटणाची नळी मिळाली नाही म्हणून तक्रार करण्यात सुरुवात केली. ही तक्रार वर आणि त्याच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचली. वराच्या कुटुंबियांनी वधू पक्षाला याचा जाब विचारला. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये हाणामारी सुरू झाली. यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले.

पोलिसांनीही दोन्ही पक्षांची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र वराचे कुटुंबीय काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. असे करून आपला अपमान झाल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्याचवेळी, वधूच्या कुटुंबीयांनी युक्तिवाद केला की, जेवणात मटण असेल, असे नोव्हेंबरमध्ये झालेल्या साखरपुड्यावेळी ठरले होते. पण, त्यात मटणाच्या नळ्या असतीलच, असे नाही. जेवणात मटणाच्या नळ्या समाविष्ट करण्याबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही, म्हणून ते दिले गेले नाही. पोलिसांनी खूप समजावूनही नवरदेव ऐकायला तयार नव्हता. अखेर दोन्हीकडच्या मंडळींनी हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.

साखरपुड्यातच ठरला होता लग्नाचा मेन्यू

मुलीच्या घरी पार पडलेल्या साखरपुड्याच्या दिवशीच लग्नाला आलेल्या वऱ्हाडींसाठी काय मेन्यू असायला हवा, याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतरच वर पक्षाकडील मंडळींनी लग्नाला होकार दिला होता. या व्यवस्थेअंतर्गत वधूच्या कुटुंबीयांनी लग्नातील पाहुण्यांसाठी मांसाहाराची सोय केली होती. मटणावर ताव मारत असतानाच, त्यात नळ्या नसल्याने वर पक्षाच्या नातेवाईकांनी वाद घातला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तेलुगू चित्रपट ‘बालागम’सारखीच ही कथा असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे.

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा; गुढीपाडव्यापासून १५ डब्यांच्या लोकल वाढणार, १६ उपनगरीय सेवांचे होणार रूपांतर

Gudi Padwa 2026 : उद्या स्वागत यात्रांचा मुंबईभर जल्लोष; गिरगाव, कुर्ला, दादर येथे चित्ररथ, खेळांची पर्वणी

इंदूरमध्ये EV चार्ज करताना शॉर्ट सर्किट; सिलिंडरचा भीषण स्फोट, ७ जणांचा दुर्दैवी अंत

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘रत्नागिरीचा राजा’ शहरात दाखल; हापूसच्या आगमनाने बाजारात सुगंध, दर मात्र दुपटीने वाढले

मध्य रेल्वे २०१२ उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवणार; अतिरिक्त १२० विशेष गाड्या चालविण्याचे नियोजन