किश्तवाड/जम्मू : जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड येथील चशोटी गावात गुरुवारी झालेल्या ढगफुटीनंतर आतापर्यंत ६५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अद्यापही अनेक लोक पाण्यात आणि ढिगाऱ्यात अडकले आहेत. मृतांपैकी ४० जणांची ओळख पटली असून १६७ जणांना वाचवण्यात यश आले आहे.
त्यापैकी ३८ जणांची प्रकृती गंभीर आहे, तर १०० हून अधिक जण अद्यापही बेपत्ता असल्याचे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
माता यात्रेसाठी माचैल किश्तवाडमधील पद्दार उपविभागातील चशोटी गावात हजारो भाविक पोहोचले होते तेव्हा ही दुर्घटना घडली. सदर यात्रेचा हा पहिला थांबा आहे. यात्रा जेथून सुरू होणार होती त्या ठिकाणी ढगफुटी झाली. त्यानंतर बसेस, तंबू, लंगर आणि भाविकांची अनेक दुकाने होती ती सर्व पुरात वाहून गेली. किश्तवाडचे उपायुक्त पंकज शर्मा म्हणाले की, एनडीआरएफची टीम शोध-बचावकार्यात गुंतली आहे. आणखी दोन पथके मार्गावर आहेत. प्रत्येकी ६० जवानांची पाच लष्करी पथके व्हाइट नाइट कॉप्सचे वैद्यकीय पथक, जम्मू आणि काश्मीर पोलीस, एसडीआरएफ आणि इतर एजन्सी या ऑपरेशनमध्ये गुंतले आहेत.