रविवारी रात्री चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडवर विजय मिळवल्यानंतर मध्य प्रदेशच्या देवास येथे काही तरुणांनी 'अतिउत्साही' जल्लोष केला होता. याप्रकरणी पोलिसांनी तरुणांच्या गटाला ताब्यात घेऊन त्यांचे मुंडन केले आणि परेड देखील काढली. प्रकरणाला हिंसक वळण मिळाल्यामुळे आणि पोलिसांवर हल्ला केल्यामुळे दोघांविरुद्ध कठोर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) लागू करण्यात आला आहे. NSA अंतर्गत एखाद्या व्यक्तीला १२ महिन्यांपर्यंत ताब्यात ठेवता येते.
पोलिसांनी सोमवारी अतिउत्साही तरुणांच्या गटातील काहींना ताब्यात घेत त्यांचे मुंडन केले आणि पोलिस स्टेशनपासून सयाजी गेटपर्यंत त्यांची परेड देखील काढली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यानंतर भाजपच्या स्थानिक आमदार Gayatri Raje Puar यांनी मंगळवारी देवासचे पोलिस अधीक्षक (एसपी) पुनीत गेहलोत यांची भेट घेतली आणि कठोर शिक्षेचा तीव्र निषेध केला.
ते काही सराईत गुन्हेगार नाहीत-
अन्य देशवासियांप्रमाणेच हे तरुण भारताच्या विजयाचा आनंद साजरा करीत होते. ते काही सराईत गुन्हेगार नाहीत. त्यामुळे अशाप्रकारे त्यांची परेड काढणे पूर्णतः अन्यायकारक आहे. त्यांच्या कुटुंबियांसह मी एसपी कार्यालयात जाऊन या कठोर शिक्षेचा तीव्र निषेध केला. एसपींनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहे, असे आमदारांनी सांगितले.
सात दिवसांत चौकशी पूर्ण करणार
रविवारी रात्रीच्या आणि सोमवारच्या घटनाक्रमाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीत सर्व पैलू तपासले जातील. अटक करण्यात आलेले तरुण प्रत्यक्षात घटनेत सामील होते का, हेही तपासले जाईल. अतिरिक्त एसपी जयवीर सिंग भदौरिया यांना सात दिवसांच्या आत चौकशी पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. दोषी आढळलेल्या व्यक्तींवर योग्य ती कारवाई केली जाईल," असे पुनीत गेहलोत यांनी सांगितले.
काय होती घटना?
माहितीनुसार, रविवारी रात्री भारताच्या विजयानंतर सयाजी गेट येथे काही तरुणांचा गट धोकादायक पद्धतीने फटाके फोडत होता. स्टेशन प्रभारी अजय सिंग गुर्जर यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला असता वाद निर्माण झाला. तरुणांनी पोलिसांशी गैरवर्तन केले, काहींनी पोलिसांच्या वाहनाचा पाठलाग करत दगडफेक देखील केली. या घटनेच्या व्हिडिओ फुटेजच्या आधारे पोलिसांनी १० तरुणांना ताब्यात घेतले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी, काही तरुणांचे बळजबरी मुंडन करून पोलिस स्टेशनपासून सयाजी गेटपर्यंत परेड काढण्यात आली. तथापि, तरूण केवळ आनंदोत्सव साजरा करत होते. पोलिसांनी आधी गैरवर्तन केले आणि काही वेळाने मोमोज विक्रेत्याला विनाकारण मारहाण केली, असा दावाही काही स्थानिकांकडून केला जात आहे.