नवी दिल्ली : ८०० टन कांदा घेऊन जाणारी पहिली ‘कांदा एक्स्प्रेस’ बुधवारी दिल्लीत पोहोचणार आहे. हा कांदा प्रति किलो ३५ रुपये दराने विकला जाईल, अशी माहिती ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी दिली.
येथील नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्रीय भंडार दुकानांद्वारे कांद्याची किरकोळ विक्री केली जाईल. चेन्नई, एर्नाकुलम, मदुराई आणि गुवाहाटी या इतर चार केंद्रांवर देखील समर्पित रेल्वे रॅकद्वारे मोठ्या प्रमाणात कांदा पाठवला जात आहे, असे त्यांनी पुढे सांगितले. या उपभोगत्या केंद्रांवर पाठवला जाणारा कांदा हा नाशिक येथे जतन केलेला ‘बफर स्टॉक’ आहे. वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा साठा बाजारात आणला जात आहे.
मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २४ ऑगस्ट रोजी कांद्याचा सरासरी किरकोळ दर वर्षभरापूर्वीच्या ₹२७.३७ किलोवरून ५९ टक्क्यांनी वाढून ४३.५३ रुपये किलो झाला आहे.
प्रमुख शहरांमध्ये, सोमवारी कांद्याचे किरकोळ दर चेन्नईमध्ये ६० रुपये किलो (वर्षापूर्वी ₹३३), दिल्लीत ५५ रुपये किलो (₹३५) आणि कोलकाता येथे ५३ रुपये किलो होते.
मोठ्या प्रमाणावर कांद्याची वाहतूक सुलभ करण्यासाठी आणि लॉजिस्टिक कार्यक्षमता वाढवण्यासाठी २०२४-२५ मध्ये ‘कांदा एक्स्प्रेस’ सुरू केली.
२०२४-२५ मध्ये, जवळपास १२,००० टन कांद्याचा बफर साठा घेऊन जाणाऱ्या १४ रेल्वे रॅक ५ शहरांमध्ये पाठवल्या होत्या. २०२५-२६ मध्ये, हे प्रमाण वाढून देशभरातील १६ प्रमुख शहरांमध्ये सुमारे ८८,००० टन कांदा घेऊन जाणाऱ्या ८६ रॅकपर्यंत पोहोचले आहे.
१.२१ लाख टन कांद्याचा बफर साठा
२०२५-२६ मधील अंदाजित ३०७.३७ लाख टन उत्पादनाच्या आधारे, आगामी महिन्यांत देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी कांद्याची उपलब्धता समाधानकारक आहे, जी मागील वर्षाच्या ३०७.६७ लाख टनांच्या जवळपास समान आहे. सणासुदीची मागणी, हवामानातील बदल, पुरवठा साखळीतील हालचाली आणि बदलत्या मागणीच्या स्वरूपामुळे ऑगस्ट-सप्टेंबरपासून कांद्याच्या किमतीत सामान्यतः हंगामी वाढ दिसून येते.