बालोद : छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यात गुरुवारी रात्री एका प्रवासी बसची रस्त्याच्या कडेला उलटलेल्या ट्रकला धडक बसल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आणि १६ जण जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले.
पुरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३० वर मरकटोला घाटात खासगी बस ट्रकच्या मागील बाजूस धडकली, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. बस धमतरीहून कांकेरकडे निघाली होती. गुरुवारी रात्री चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उलटलेल्या ट्रकला बसची धडक बसली व त्यात धमतरी येथील संजय राखाटे, ललित साहू आणि अभानपूर येथील मेहंदी खान या तिघांचा मृत्यू झाला, तर १६ जण जखमी झाले.
जखमींपैकी १२ जणांना कांकेरमधील चारमा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर चार जणांना प्रगत उपचारांसाठी धमतरी येथे हलवण्यात आले आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.
भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळावरून पळून गेलेल्या बसचालकाला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली असून जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.