नवी दिल्ली : देशातील तरुणांचे कल्याण आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करणे हेच सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असून, त्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या एकाही दोषीला सोडले जाणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिला. पेपरफुटी प्रकरणात सहभागी असलेल्यांना तातडीने आणि कठोर शिक्षा मिळावी यासाठी सरकारने ‘फास्ट ट्रॅक’ (जलद गती) न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी जाहीर केले.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर या संदर्भात त्यांनी पोस्ट केली. तरुणांच्या भविष्याला हानी पोहोचवणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे मोदी यांनी त्यात म्हटले आहे.
कॉकरोचचे प्रत्युत्तर : कॉकरोच जनता पार्टीने मोदींच्या घोषणा म्हणजे मूळ विषयावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याची टीका केली. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व अन्य दोन अटींवर तत्काळ मान्य कराव्यात हीच आपली मागणी असल्याचा पुनरुच्चारही पार्टीने केला.
काँग्रेसची टीका : काँग्रेसनेही गुरुवारी मोदींवर तीव्र शब्दांत टीका केली. मोदी ‘घाबरले अन् हादरले’ असून त्यांनी देशातील तरुणांच्या भविष्याचे सर्वाधिक नुकसान केले आहे, असा दावा काँग्रेसने केला.