मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (६६) यांचे बुधवारी बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान दुर्घटनेत निधन झाले. अजित पवार यांचे अकाली निधन हे भारताच्या त्या दुर्दैवी इतिहासातील आणखी एक काळे पान ठरले आहे, ज्यामध्ये अनेक नामवंत नेत्यांनी विमान दुर्घटनांमध्ये आपले प्राण गमावले आहेत. भारताच्या राजकीय इतिहासात विमान अपघातांमुळे अनेक महान नेत्यांचा अकाली मृत्यू झाला. बुधवारी अजित पवार यांचा बारामती येथे लियरजेट ४५विमानाच्या दुर्घटनेत मृत्यू झाल्याने ही शोकांतिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महान नेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापासून होते. १८ ऑगस्ट १९४५ रोजी, ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढणाऱ्या भारतीय राष्ट्रीय सेनेचे नेतृत्व करणारे नेताजी जपानी लष्करी विमानातून प्रवास करत होते. तैहोकू येथे टेकऑफनंतर काही क्षणांतच हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. विमानावर जादा भार असल्यामुळे इंजिन निकामी झाले आणि स्फोट झाला.
बलवंतराय मेहता : १९६३ ते १९६५ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री होते. १९६५ च्या युद्धादरम्यान मेहता कच्छच्या रणात निरीक्षणासाठी उड्डाण करत होते. त्याचवेळी पाकिस्तानने त्यांचे विमान पाडले. या दुर्घटनेत मेहता, त्यांची पत्नी, तीन कर्मचारी, एक पत्रकार आणि दोन क्रू सदस्यांचा मृत्यू झाला. मेहता हे विमान अपघातात मृत्यू पावणारे पहिले मोठे राजकीय नेते होते.
संजय गांधी (१९८०) : सफदरजंग विमानतळाजवळ स्वतः विमान उडवत असताना २३ जून १९८० रोजी त्यांचे विमान कोसळले. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
माधवराव सिंधिया (२००१) : काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री माधवराव सिंधिया यांचे २००१ मध्ये एका रॅलीला संबोधित करण्यासाठी कानपूरला जात असताना त्यांचे खासगी विमान कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.
जी.एम.सी. बालयोगी (२००२) : माजी लोकसभाध्यक्ष आणि तेलुगु देसम पक्षाचे नेते यांचे आंध्र प्रदेश येथे हेलिकॉप्टर अपघातात ३ मार्च २००२ रोजी निधन झाले होते.
सायप्रियन सांगमा (२००४) : मेघालयचे तत्कालीन ग्रामीण विकास मंत्री सायप्रियन सांगमा यांचे हेलिकॉप्टर अपघातात २२ सप्टेंबर २००४ रोजी निधन झाले होते.