नवी दिल्ली: 'नीट' पेपरफुटीच्या वादावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना तातडीने पदावरून हटवावे किंवा या प्रकरणाची वैयक्तिक जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या युतीने भारताची संपूर्ण शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
'नीट' परीक्षेसाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या २२ लाख विद्यार्थ्यांचे कष्ट सरकारने वाया घालवले असल्याचे राहुल गांधी यांनी निवेदनात म्हटले आहे. परीक्षेपूर्वी दोन दिवस आधीच प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर वाटली जात होती, हे संपूर्ण देशाला माहीत आहे. मात्र, या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान सांगत आहेत, असे त्यांनी नमूद केले.
विद्यापीठे, कुलगुरू आणि प्राध्यापक पदांवर केवळ पैसे कमवण्यासाठी आरएसएस, भाजप आणि त्यांच्याशी संबंधित लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे, असा आरोप त्यांनी केला.