काँग्रेसची 'भारत जोडो न्याय यात्रा' मंगळवारी सकाळी आसामच्या गुवाहाटी शहरात प्रवेश करत असताना पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर आक्रमक झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स तोडले. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "आम्ही बॅरिकेड्स तोडले, पण कायदा नाही तोडणार", असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
"आम्हाल कमजोर समजू नका, आम्ही बॅरिकेड्स तोडले आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते कोणाला घाबरत नाहीत, असे म्हणत राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचा उल्लेख 'बब्बर शेर' असा केला.
ही यांची स्टाईल आहे, आम्ही यांना घाबरत नाही-
आसामचे मुख्यमंत्री यात्रेच्या विरोधात आहेत. यामुळे यात्रेचा फायदा झाला आहे. आसामचे मुख्यमंत्री आणि त्यांच्यामागे अमित शाह आमची मदत करत आहेत, त्यामुळे आमचा फायदाच फायदा आहे, असे राहुल गांधी म्हणाले. आज, मंदिरात जाण्यापासून रोखले जात आहे. कॉलेजमध्ये जाण्यापासून रोखले जात आहे. ही यांची स्टाईल आहे. आम्ही यांना घाबरत नाही. आमचा संदेश गावागावात जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
बजरंग दल, जेपी नड्डा यांची पदयात्रा जाऊ शकते. आमची यात्रा रोखली जाते. त्यामुळे विरोधी पक्षाची लढाई काँग्रेस लढत आहे हे क्लिअर आहे. आम्ही मणिपूर जळत असल्याचा मेसेज देण्यासाठी मणिपूरमधून यात्रा सुरु केली, असेही राहुल यांनी यावेळी स्पष्ट केले.
तुमची चूक नाही-
"तुमची चूक नाही. तुम्हाला आदेश ऐकावे लागतात. तुम्ही तुमचे काम चांगले केले. एक व्यक्ती इथे आला, बसच्या समोर झोपला. मात्र, एक लक्षात ठेवा, आसाममध्ये न्याय झाला पाहिजे. आसाममध्ये अन्याय व्हायला नको. आम्ही इथे तुमच्याशी लढायला नाही आलो. आमचे तुच्यावर प्रेम आहे, असे राहुल गांधी यात्रा रोखणाऱ्या पोलिसांना म्हणाले. तसेच, यावेळी त्यांनी काही पोलिस हसत टाळ्या वाजवत असल्याचे मिश्किलपणे सांगितले. नंतर, लगेचच "चुकूनपण टाळ्या वाजवू नका, फक्त मनात ठेवा", असेही ते पोलिसांना म्हणाले.