नवी दिल्ली : सिंधचा प्रदेश आज भारताचा भाग नसला, तरी संस्कृतीनुसार तो नेहमीच भारताचा भाग राहील. सीमा कधी बदलेल हे कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे उद्या सिंध भारताचा भाग होऊ शकतो, असे सूचक विधान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या एका पुस्तकाचा हवाला देत केले.
रविवारी दिल्लीत एका सिंधी अधिवेशनाला संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी हे वक्तव्य केले. त्यांनी लालकृष्ण अडवाणींचा उल्लेख करत म्हटले की, त्यांनी (अडवाणी) त्यांच्या एका पुस्तकात लिहिले आहे की, सिंधी हिंदू, विशेषतः त्यांच्या पिढीतील लोक अजूनही सिंधला भारतापासून वेगळे मानत नाहीत.
आपण त्यांचा (अडवाणींचा) एक कोट आज सांगत आहे. आज सिंधची भूमी भारताचा भाग भलेही नसेल. पण सभ्यतेच्या दृष्टीने सिंध नेहमीच भारताचा भाग राहील. आता राहिली गोष्ट जमिनीची, तर सीमा कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही. कारण उद्या सिंध भारताला पुन्हा परत मिळू शकते. सिंधू नदीला पवित्र मानणारे आपले सिंधचे लोक कोठेही असले तरी ते नेहमीच आपले असतील, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या नेत्यांनी सिंध प्रदेश भारतापासून वेगळे होणे हे कधीही स्वीकारले नाही, असे राजनाथ सिंह यांनी नमूद केले.
फाळणीनंतर सिंध प्रांत बनला पाकचा भाग
खरं तर, १९४७ मध्ये भारत-पाकिस्तान फाळणीनंतर सिंध प्रांत पाकिस्तानचा भाग बनला. हा पाकिस्तानचा तिसरा सर्वात मोठा प्रांत आहे, ज्याची राजधानी कराची आहे. या प्रांतात उर्दू, सिंधी आणि इंग्रजी भाषा बोलल्या जातात.
संरक्षण मंत्री काय म्हणाले?
आपण आज या ठिकाणी लालकृष्ण अडवाणी यांचाही उल्लेख करू इच्छितो. त्यांनी त्यांच्या एका पुस्तकात लिहिले आहे की, सिंधी हिंदूंनी विशेषतः त्यांच्या पिढीतील लोकांनी आजही सिंध प्रांत भारतापासून वेगळा होणे स्वीकारलेले नाही. केवळ सिंधमध्येच नाही तर संपूर्ण भारतात सिंधू नदीला हिंदू पवित्र मानतात आणि सिंधमधील काही मुस्लिमही सिंधू नदीला पवित्र मानत होते. सिंधूचे पाणी मक्केच्या ‘आब-ए-जमजम’पेक्षाही कमी पवित्र नाही. हे अडवाणींचे वाक्य आहे, असे ते म्हणाले.