राष्ट्रीय

बचतगटांच्या बाजारपेठेतून ५०० कोटींच्या उत्पादनांची विक्री!

मध्य प्रदेशातील करहलमधील श्योपूर येथे आयोजित बचतगट मेळाव्यात ते बोलत होते.

वृत्तसंस्था

एक जिल्हा, एक उत्पादन उपक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यातून स्थानिक उत्पादने मोठ्या बाजारपेठेत नेण्याचा हा प्रयत्न आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिला उद्योजकांसाठी नवीन संधी निर्माण करण्यासाठी सरकार सतत काम करत आहे. बचत गटांनी, खास त्यांच्या उत्पादनांसाठी तयार केलेल्या बाजारपेठांमध्ये ५०० कोटी रुपयांची उत्पादने विकली आहेत. पीएम वन धन योजना आणि पीएम कौशल विकास योजनेचे लाभ महिलांपर्यंत पोहोचत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मध्य प्रदेशातील करहलमधील श्योपूर येथे आयोजित बचतगट मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी पंतप्रधानांनी पीएम कौशल विकास योजनेंतर्गत चार विशेषत: वंचित आदिवासी गट (पीव्हीटीजी) कौशल केंद्रांचे उद्घाटनदेखील केले. पंतप्रधानांनी बचतगटातील सदस्यांना बँक कर्ज मंजुरीची पत्रे सुपूर्द केली आणि जल जीवन मिशनअंतर्गत किट देखील त्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. यावेळी बचतगटाच्या सुमारे एक लाख महिला सदस्य प्रत्यक्ष उपस्थित होत्या आणि सुमारे ४३ लाख महिला विविध केंद्रांवरून आभासी माध्यमातून कार्यक्रमाशी जोडल्या गेल्या होत्या.

दोन कोटी महिला घरमालक !

“पीएम आवास योजनेंतर्गत मिळालेल्या घरांच्या मालकी हक्कात महिलांच्या नावांचा समावेश केला जात आहे. सरकारने देशातील दोन कोटींहून अधिक महिलांना घरमालक बनण्यास सक्षम केले आहे. मुद्रा योजनेंतर्गत, देशभरातील लघु उद्योग आणि व्यवसायांना आतापर्यंत १९ लाख कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. यातील सुमारे ७० टक्के रक्कम महिला उद्योजकांना मिळाली आहे. सरकारच्या अशा प्रयत्नांमुळे आज घरातील आर्थिक निर्णयांमध्ये महिलांचा सहभाग वाढत आहे, याचा मला आनंद आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.

पंचायत निवडणुकीत १७ हजार महिला जिकल्या !

“आजच्या नव्या भारतात महिला शक्तीचा झेंडा पंचायत भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत फडकत आहे. नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकीत १७ हजार महिला निवडून आल्या. हे मोठ्या बदलाचे लक्षण आहे. बचतगट अर्थात ‘स्वयं सहाय्यता गट’ हे कालांतराने ‘राष्ट्रीय मदत गट’ बनले. कोणत्याही क्षेत्रातील यशाचा थेट संबंध महिलांचे प्रतिनिधित्व किती वाढले आहे, याच्याशी असतो,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.

Mumbai : पावसाळ्यात समुद्रात २४ दिवस उंच लाटा उसळणार

घर, शेती शर्तभंगासाठीचे हेलपाटे थांबणार; जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना नियमितीकरणाचे अधिकार, महसूल विभागाचा निर्णय

मुंबईची आरोग्य व्यवस्था बळकट होणार; नवीन पालिका रुग्णालयात साडेचार हजार बेड्स

Mumbai : सरकारी जप्तीपेक्षा बँक आधी मालमत्ता विकू शकते; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

बदलापूर प्रकरण : पीडित मुलींच्या शिक्षणाचा खर्च सरकार करणार; दहावीपर्यंतचे प्रवेश शुल्क भरणार