नवी दिल्ली : दुसऱ्या देशांच्या सेवेसाठी भारतीय टॅलेंटचा कायमच वापर झाला आहे, अशी टीका ‘इंडियन ओवरसीज काँग्रेस'चे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी केली. पित्रोदा यांच्या या वक्तव्यावर भाजपने जोरदार टीका केली आहे.
भारताच्या तांत्रिक परिसंस्थेबाबत एका मुलाखतीत ते म्हणाले की, १५० कोटी लोकसंख्या असलेल्या देशाकडे स्वत:ची ऑपरेटिंग सिस्टीम नाही. भारतात बुद्धिमान तरुणांची संख्या मोठी असली तरीही त्यांच्याकडून देशात नावीन्यपूर्ण संशोधन होत नाही. भारतीय बुद्धिवंतांकडून बहुराष्ट्रीय कंपन्यांतील प्रोग्रामिंग, बँकिंग, कायदा यंत्रणा, उद्योग, उत्पादन, लॉजिस्टीकला मदत मिळाली. पण, भारताने स्वत: कधीही जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान उत्पादने बनवली नाहीत.
भारतीय गुणवान तरुणांचा वापर कायमच दुसऱ्या देशांची सेवा करायला झाला, अशी टीका त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, आपण स्वत:चा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनवला नाही. तसेच मायक्रोसॉफ्टसारखी मोठी कंपनी सुरू केली नाही. आपण संगणक व मोबाईलसाठी ऑपरेटिंग सिस्टीम बनवू शकलो नाही.
भाजपचा पलटवार
भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, ‘लष्कर-ए-काँग्रेस’च्या मुख्य सल्लागाराने पुन्हा खोटे बोलून भारताची थट्टा उडवली आहे. दुर्दैवाने काँग्रेसची एकमेव मोहीम म्हणजे, भारताला बदनाम करणे ही आहे. यूपीआय, आत्मनिर्भर लस किंवा ‘ऑपरेशन सिंदूर’ आदी नावलौकिक कामगिरी करूनही अर्थव्यवस्था संपली आहे, अशी टीका काँग्रेसकडून केली जाते. काँग्रेस ही भारताचा द्वेष करते, असे ते म्हणाले.