सिंगापूर : एअर इंडियाचे परिवर्तन हा दीर्घ पल्ला असून यासाठी कोणताही शॉर्टकट नाही, असे ‘सिंगापूर एअरलाइन्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी गो चून पोंग यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. पाकिस्तानची हवाई हद्द बंद असणे आणि रुपयाचे अवमूल्यन आदींचा सामना एअर इंडियाला करावा लागत आहे, असे त्यांनी सांगितले.
‘सिंगापूर एअरलाइन्स’ (एसआयए) समूहाच्या २०२५-२६ आर्थिक वर्षाच्या आर्थिक निकालांवर चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. एअर इंडियासमोरील आव्हाने ही प्रामुख्याने बाह्य स्वरूपाची असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
एअर इंडियामधील गुंतवणुकीमुळे भारताच्या वेगाने वाढणाऱ्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत थेट सहभाग घेता येत असल्याचे पोंग यांनी सांगितले. सिंगापूरच्या पलीकडे असलेल्या विमान वाहतूक बाजारपेठेत थेट सहभागी होऊन समूहाची दीर्घकालीन वाढ सुनिश्चित करण्यासाठी ही गुंतवणूक महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. पोंग यांनी एअर इंडियासमोरील मुख्य आव्हानांमध्ये पुरवठा साखळीतील विस्कळीतपणा, मध्यपूर्वेतील संघर्ष, पाकिस्तानची हवाई हद्द बंद असणे, एआय१७१ अपघात आणि रुपयाचे अवमूल्यन यांचा समावेश केला.
पाकिस्तानची हवाई हद्द वर्षभरापेक्षा जास्त काळ बंद असल्याने विमानांच्या मार्गांत अडथळे येत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय सेवांसाठी लांबचा मार्ग घ्यावा लागत असल्याने एअर इंडियाच्या परिचालन खर्चात वाढ झाली आहे.
२६,७०० कोटींचा तोटा
सिंगापूर एअरलाइन्स समूहाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, मार्च २०२६ अखेर एअर इंडियाचा तोटा २६,७०० कोटी रुपयांहून अधिक आहे. हवाई हद्दीवरील निर्बंध आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे कंपनीला या आर्थिक फटक्याचा सामना करावा लागला.