नवी दिल्ली : स्पेशल टास्क फोर्सने तीन संशयित दहशतवाद्यांना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे दोन किलो आरडीएक्स आणि एक इम्प्रोव्हाइज्ड एक्स्प्लोसिव्ह डिव्हाइस (आयईडी) जप्त केले आहे.
तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाइकवरून टिफिनमधून स्फोटक सामग्रीची वाहतूक करत होते. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडीत देण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये बसलेला दहशतवादी संचालक शहजाद भट्टी याच्या इशाऱ्यानुसार ते काम करत होते, असे या दहशतवाद्यांनी कबूल केले आहे. त्यांच्या योजनेनुसार दिल्ली, पंजाब आणि राजस्थानमधील अनेक ठिकाणी स्फोट घडवून आणायचे होते.
पहिला स्फोट राजस्थानमधील हनुमानगढी परिसरात करण्याचे ठरले होते. आरोपींनी तेथे एक आयईडीही बसवला होता. मात्र, पाकिस्तानमधून आरडीएक्सचा पुरवठा उशीरा झाल्यामुळे स्फोट घडवता आला नाही. चार दिवस प्रतीक्षा केल्यानंतर त्यांनी तेथून आयईडी काढून घेतला. यानंतर आरोपींनी सुमारे एक आठवडा हरयाणा, पंजाब आणि दिल्लीतील विविध ठिकाणांची रेकी केली. त्यांनी त्या ठिकाणांचे व्हिडिओ तयार करून व्हॉट्सअॅपद्वारे पाकिस्तानमधील त्यांच्या हँडलर्सना पाठवले, जेणेकरून अंतिम लक्ष्य निश्चित करता येईल. मुलाना येथील श्री माता बालासुंदरी देवी मंदिर, अंबालामधील एका राजकारण्याचे घर, पंजाबमधील काही पोलीस ठाणे, दिल्लीतील सफदरजंग रुग्णालय आणि निजामुद्दीन रेल्वे स्थानक यांसारख्या ठिकाणांचा समावेश होता.
बॉम्बस्फोटाचा प्रयत्न उधळला
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी अली अकबर उर्फ बाबू याला भारतातील या नेटवर्कचा प्रमुख ऑपरेटिव्ह मानले जात आहे. तो राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील लोंगिया भागाचा रहिवासी आहे. १३ मार्च २०२६ रोजी सकाळी त्यांना अंबाला कँट परिसरात बॉम्ब ठेवण्याचे निर्देश मिळाले होते. मात्र, सुरक्षा यंत्रणांना त्यांच्या हालचालींबाबत आधीच गुप्त माहिती मिळाली होती. आरोपी स्फोटक घेऊन ठरलेल्या ठिकाणी जात असताना त्यांना मार्गातच पकडण्यात आले.