नवी दिल्ली : शासकीय आकडेवारीनुसार, साखरेची आयात करण्यास परवानगी देणे आणि मोठे ग्राहक तसेच व्यापाऱ्यांसाठी साठा मर्यादेचे नियम कडक करणे यासह सरकारने अलीकडेच घेतलेल्या निर्णयांमुळे एका आठवड्यात साखरेचा सरासरी सर्व-भारतीय किरकोळ दर ३.८५ टक्क्यांनी घसरून ६२.५७ रुपये प्रति किलोवर आला आहे.
सूत्रांनुसार, घाऊक दरातील घसरण किरकोळ बाजारात दिसण्यासाठी वेळ लागतो; कारण ज्या किरकोळ व्यापाऱ्यांनी जुन्या, जास्त दराने साठा खरेदी केला आहे ते तो तोट्यात विकण्यास तयार नसतात आणि जुना साठा संपेपर्यंत ते तो जुन्याच दराने विकत राहतील.
एका किरकोळ व्यापाऱ्याकडे सामान्यतः प्रत्येकी ५० किलो वजनाची साखरेची १० ते १५ पोती असतात. जेव्हा कमी दराने नवीन साठा खरेदी केला जाईल, तेव्हाच किरकोळ दर त्यानुसार समायोजित होतील.
किरकोळ दरातील बदल दिसून येण्यासाठी कमीत कमी दहा दिवसांचा कालावधी लागतो, असे उद्योग जगतातील एका सूत्राने सांगितले.
साखरेच्या दरातील अचानक होणारी वाढ रोखण्यासाठी सरकारने १० लाख टन साखर आयातीला परवानगी देणे आणि मोठे ग्राहक व व्यापाऱ्यांसाठी साठा मर्यादेचे नियम कडक करणे यासह अनेक उपाययोजना केल्या आहेत.
२०२५-२६ च्या विपणन वर्षासाठी (ऑक्टोबर-सप्टेंबर) साखरेच्या उत्पादनाचा अंदाज पूर्वीच्या ३४३ लाख टनांवरून घटवून ३०६ लाख टन करण्यात आला असला तरी, देशात साखरेचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे सांगत केंद्र सरकारने दर वाढवण्यासाठी साखर कारखान्यांना जबाबदार धरले आहे. देशांतर्गत वार्षिक मागणी २८० ते २८५ लाख टन असल्याचा अंदाज आहे.
...तरी दर अधिकच
एका आठवड्यापूर्वी साखरेचा किरकोळ दर ६५.०८ रुपये प्रति किलो होता. तरीही, हे दर मागील महिन्यातील ४९.३३ रुपये प्रति किलो या पातळीपेक्षा अजूनही २७ टक्क्यांनी अधिक आहेत. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, साखरेचा सरासरी घाऊक दरदेखील एका आठवड्यापूर्वीच्या ६०.३९ रुपये प्रति किलोवरून २ सप्टेंबर रोजी ५७.६२ रुपये प्रति किलोवर खाली आला आहे.