बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीची सुटका करून लावून दिला विवाह एआयने बनविलेली प्रतिमा
राष्ट्रीय

बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीची सुटका करून लावून दिला विवाह

कायद्याच्या पलीकडे जात सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात 'सिक्स्थ सेन्स' आणि माणुसकीने अनोखे न्यायदान केले आहे. बलात्काराच्या आरोपाखाली १० वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या एका तरुणाची केवळ सुटकाच केली नाही, तर पीडितेसोबत त्याचे लग्न लावून देऊन या प्रकरणाचा शेवट गोड केला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : कायद्याच्या पलीकडे जात सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात 'सिक्स्थ सेन्स' आणि माणुसकीने अनोखे न्यायदान केले आहे. बलात्काराच्या आरोपाखाली १० वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या एका तरुणाची केवळ सुटकाच केली नाही, तर पीडितेसोबत त्याचे लग्न लावून देऊन या प्रकरणाचा शेवट गोड केला आहे.

प्रकरण काय

मध्य प्रदेशातील एका तरुणाचे आणि तरुणीचे २०१५ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमसंबंध जुळले होते. दोघांनी परस्पर संमतीने शारीरिक संबंधही ठेवले. मात्र, लग्नाच्या तारखेवरून झालेल्या वादातून आणि तरुणाने लग्नास विलंब केल्यामुळे तरुणीने २०२१ मध्ये बलात्काराची तक्रार दाखल केली. कनिष्ठ न्यायालयाने तरुणाला दोषी ठरवून १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

असा झाला भास

न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर जेव्हा हे प्रकरण आले, तेव्हा त्यांना यात काहीतरी वेगळे असल्याचे जाणवले. प्रकरणातील तथ्ये पाहताना आम्हाला 'सिक्स्थ सेन्स'ने असे सुचवले की, हे केवळ एका गैरसमजामुळे बिघडलेले प्रकरण आहे आणि या दोघांना पुन्हा एकत्र आणता येईल, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.

समुपदेशन आणि विवाह

न्यायालयाने आरोपीला पोलीस संरक्षणात न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले. न्यायाधीशांनी स्वतः चेंबरमध्ये दोघे आणि त्यांच्या पालकांशी चर्चा केली. संवादातून असे स्पष्ट झाले की, दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते. त्यानंतर न्यायालयाने तरुणाला लग्नासाठी जामीन मंजूर केला. जुलै महिन्यात या दोघांचा विवाह पार पडला.

नोकरीही मिळणार परत

हे दांपत्य सुखाने संसार करत असल्याची खात्री पटल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या कलम १४२ अंतर्गत आपल्या विशेष अधिकारांचा वापर करून तरुणावरील सर्व गुन्हे आणि शिक्षा रद्द केली. तसेच, या प्रकरणामुळे गेलेली त्याची सरकारी रुग्णालयातील नोकरीही पुन्हा बहाल करण्याचे आणि थकीत पगार देण्याचे आदेश मध्य प्रदेश प्रशासनाला दिले आहेत.

केवळ एका गैरसमजामुळे परस्पर संमतीच्या संबंधांना गुन्हेगारी रंग देण्यात आला होता. लग्नाची तारीख पुढे ढकलल्याने निर्माण झालेल्या गैरसमजातून ही तक्रार झाली होती, मात्र आता संपूर्ण न्याय झाला आहे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.

बुलेट ट्रेन प्रकल्पाला आणखी वेग; पालघरमधील तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचे 'ब्रेकथ्रू' पूर्ण

एक्स्प्रेसमध्ये खराब फळांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई; १५ दिवसांची विशेष मोहीम सुरू

Mumbai : विश्वासाचा गैरफायदा घेतला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले! उच्च न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन नाकारला

रवीना टंडनच्या आईच्या घरातील चोरीप्रकरणी मोलकरणीला अटक; २५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने केले हस्तगत

गाय ही माता मानण्याचे बंधन मुस्लिमांवर नाही! हुसेन दलवाई यांचे वादग्रस्त विधान