नवी दिल्ली : पंजाबमध्ये अलीकडेच झालेल्या बॉम्बस्फोटांच्या संदर्भात केलेल्या कथित बदनामीकारक वक्तव्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे नेते तरुण चुघ यांनी गुरुवारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
या नोटीसमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, मुख्यमंत्री मान यांनी कोणत्याही विश्वासार्ह पुराव्याशिवाय या स्फोटांचे संबंध भाजपशी जोडत ‘खोटी, निराधार आणि प्रक्षोभक’ विधाने केली आहेत. मान यांचे हे विधान राजकीयदृष्ट्या प्रेरित असून त्यामुळे ‘सार्वजनिक अशांतता निर्माण होऊ शकते आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू शकते,’ असेही या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, पंजाबचे पोलीस महासंचालक यांनी या स्फोटांचा संबंध परकीय शत्रू आणि आयएसआयपुरस्कृत नेटवर्कशी असल्याचे संकेत दिले असताना, मुख्यमंत्र्यांचे विधान याच्या अगदी उलट असल्याचा दावा भाजपने केला आहे
भाजपने मागणी केली आहे की, भगवंत मान यांनी आपली ‘बदनामीकारक आणि खोटी’ विधाने मागे घ्यावीत आणि सात दिवसांच्या आत बिनशर्त सार्वजनिक माफी मागावी. तसे न केल्यास, भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत फौजदारी मानहानीची कारवाई करण्याचा इशारा चुघ यांनी दिला आहे.
नेमकी घटना काय?
मंगळवारी पंजाबमध्ये जालंधर आणि अमृतसर येथे दोन कमी तीव्रतेचे स्फोट झाले होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
जालंधरमध्ये रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सीमा सुरक्षा दलाच्या पंजाब फ्रंटियर मुख्यालयाबाहेर एका स्कूटरला आग लागून पहिला स्फोट झाला.
अमृतसरमध्ये काही तासांनंतर, रात्री १०:५० च्या सुमारास खासा येथील छावणी परिसराजवळ दुसरा स्फोट झाला.
पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी घटनास्थळांची पाहणी केली असून, यामागे पाकिस्तान पुरस्कृत घटकांचा हात असल्याचे संकेत दिले आहेत. माध्यमांशी बोलताना डीजीपी म्हणाले की, "ही घटना पंजाबमध्ये अशांतता निर्माण करण्याच्या पाकिस्तानच्या आएसआय कारस्थानाचा’ भाग असल्याचे दिसते. ‘ऑपरेशन सिंदूर’ची जयंती जवळ येत असल्याने अशा प्रकारचा खोडसाळपणा केला गेल्याचा आम्हाला संशय आहे."
या प्रकरणी संबंधित कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला असून, लष्कर आणि इतर तपास यंत्रणांच्या समन्वयाने तपास सुरू आहे. न्यायवैद्यक शास्त्र तांत्रिक माहिती आणि मानवी गुप्तचर यंत्रणेच्या आधारे स्फोटांचे नेमके स्वरूप शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.