जम्मू-काश्मीर बस अपघात X
राष्ट्रीय

जम्मू-काश्मीर बस अपघात: उधमपूरमध्ये बस दरीत कोसळून १५ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये भीषण बस अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी आहेत. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Mayuri Gawade

जम्मू-काश्मीरमधील डोंगराळ रस्त्यांवरील प्रवास पुन्हा एकदा जीवघेणा ठरला आहे. उधमपूर जिल्ह्यात सोमवारी (दि. २०) सकाळी प्रवासी बस दरीत कोसळल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत किमान १५ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनगर परिसरातील डोंगराळ रस्त्यावर सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. ही बस दुर्गम भागातून उधमपूरकडे येत होती.

स्थानिकांनी सुरू केलं बचावकार्य

अपघातानंतर स्थानिक नागरिक सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. त्यानंतर पोलीस, जिल्हा प्रशासन, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि आरोग्य विभागाची पथके घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून, काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी हलवण्याची तयारी सुरू आहे.

नेत्यांकडून शोक व्यक्त, मदतीचे आश्वासन

जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. “ही घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. मृतांच्या कुटुंबियांना धीर मिळावा आणि जखमी लवकर बरे व्हावेत,” अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली. तसेच प्रशासन, पोलीस, एसडीआरएफ आणि आरोग्य विभागाला तातडीने सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले.

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही शोक व्यक्त करत, “या दुःखद प्रसंगी सरकार पीडित कुटुंबांसोबत ठामपणे उभे आहे,” असे सांगितले. माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.

सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

या भीषण अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून डोंगराळ रस्त्यांवरील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

औद्योगिक जमिनींसाठी GST सारखी स्वतंत्र परिषद हवी; नियमात सुसूत्रता आणण्यासाठी 'सीआयआय'ची शिफारस

उत्तर कोरियाकडून समुद्राच्या दिशेने क्षेपणास्त्रांची चाचणी; आशियाई देशांमध्ये तणाव

मोदींकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर; ममता बॅनर्जी यांचा गंभीर आरोप

परतवाडा प्रकरणात होणार मोठा पर्दाफाश? आरोपींच्या ५ पैकी ३ मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यात पोलिसांना यश

तृणमूल काँग्रेसमुळे बंगालची संस्कृती धोक्यात; मोदींचा तृणमूलवर घणाघाती हल्ला