तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तेहरानमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांना, विद्यार्थ्यांना, यात्रेकरूंना, व्यापाऱ्यांना आणि पर्यटकांना उपलब्ध असलेल्या सर्व साधनांचा विशेषत: व्यावसायिक विमानसेवेचा वापर करून तातडीने इराण सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दूतावासाने स्पष्ट केले आहे की, ५ जानेवारी २०२६ रोजी भारत सरकारने सूचना जारी केली होती त्याचा पुढील टप्पा आणि इराणमधील बदलत्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांनी वाहतुकीच्या उपलब्ध साधनांचा वापर करून देश सोडावा. त्याचप्रमाणे नागरिकांना दूतावासाच्या सतत संपर्कात राहण्याचे आणि प्रवास, ओळखपत्रे तयार ठेवण्याचेही आवाहन केले होते.
ज्या भारतीय नागरिकांनी अद्याप दूतावासामध्ये नोंदणी केलेली नाही त्यांनी अधिकृत लिंकद्वारे ती त्वरित करावी, इराणमधील इंटरनेट अडचणींमुळे नागरिकांना स्वत: नोंदणी करणे शक्य होत नसल्यास भारतामधील त्यांच्या कुटुंबीयांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी, असेही दूतावासाने म्हटले आहे.
इराणच्या अणुकार्यक्रमावरून अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव टोकाला पोहोचलेला असताना ही सूचना जारी करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला नव्या अणुकरारासाठी तयार होण्याचा अल्टिमेटम दिला आहे, अपयशी झाल्यास गंभीर परिणाम भोगण्याचाही इशारा दिला आहे.