पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात रेल्वेचा भीषण अपघात झालाय. मागून आलेल्या मालगाडीने प्रवाशांनी भरलेल्या कंचनजंगा एक्सप्रेसला जोरदार धडक दिली. सोमवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास ही घटना घडली. यात कंचनजंगा एक्सप्रेसमधील १५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ६० हून अधिक प्रवासी जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच, अनेकजण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत २५ ते ३० जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची भीती
मिळालेल्या माहितीनुसार, आसाममधील सिलचर ते कोलकातामधील सियालदह दरम्यान धावणारी कंचनजंगा एक्स्प्रेस सियालदहला जात होती. न्यू जलपाईगुडीजवळ असलेल्या रंगपानी स्टेशनजवळ कंचनजंगा उभी असताना एका मालगाडीने तिला मागून धडक दिली, असे सब्यसाची डे, मुख्य जनसंपर्क अधिकारी- नॉर्थ फ्रंटीअर रेल्वे (NFR) यांनी सांगितले. कटिहार विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) कटिहार यांच्या म्हणण्यानुसार, १० ते १५ जणांचा मृत्यू होऊ शकतो.
खचाखच भरली होती ट्रेन?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धडक इतकी जोरदार होती की एक्सप्रेसचे दोन डब्बे एकमेकांवर चढले. तर, दोन ते तीन डबे रुळावरुन उतरले. धडक बसताच प्रवाशांचा एकच आरडाओरडा झाला. टक्कर झाल्यानंतर पॅसेंजर ट्रेनच्या किमान दोन बोगी रुळावरून घसरल्या. पर्यटकांचा हंगाम सुरू असल्याने ही ट्रेन प्रवाशांनी खचाखच भरली होती. हजारो पर्यटक उत्तर बंगालमधील हिल स्टेशन आणि शेजारील सिक्कीमला भेट देत असतात.
"दार्जिलिंग जिल्ह्यातील दुःखद रेल्वे अपघाताविषयी जाणून धक्का बसला. जिल्हा दंडाधिकारी, डॉक्टर आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे", असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले. तर, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त करत, "रेल्वे, एनडीआरएफ आणि SDRF च्या मदतीने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.जखमींना रुग्णलयात हलवण्यात येत आहे", असे सांगितले.